सोलापूर – वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता अकरावी (2025–26) चा वार्षिक निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या यशाचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा दि. 23 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संतोष कोटी होते. यावेळी उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, स्वयंअर्थसहाय्य विभाग प्रमुख सौ. सारिका महिंद्रकर, शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपप्राचार्य अनुप म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “गौरव समारंभ हा केवळ सन्मान नसून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणेचा स्रोत आहे.” वसतिगृहात राहून अभ्यास करणाऱ्या व विविध विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या मंथली टेस्ट, सुपर बॅच, स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासपूरक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सातत्याने उंचावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. जेईई अॅडव्हान्स परीक्षेत मिळालेल्या यशाचा उल्लेख करून सर्व विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेण्याचे आवाहन केले.
सौ. सारिका महिंद्रकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींचा उल्लेखनीय सहभाग अधोरेखित करत पालकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते कला, विज्ञान व स्वयंअर्थसहाय्य विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
✨ गुणवंत विद्यार्थ्यांची यादी :
🔹 कला शाखा
प्रथम – कादंबरी किरण चवरे (95.83%)
द्वितीय – सौंदर्या गौतम सोगळे (95.67%)
तृतीय – समृद्धी कुणाल पाटील (91.83%)
🔹 विज्ञान शाखा
प्रथम – साहिर माजिद महागमी (94.17%)
द्वितीय – संध्या राजू पवार (93.50%)
तृतीय – वैष्णवी सुनील पाटील (92.50%)
🔹 स्वयंअर्थसहाय्य विभाग
प्रथम – प्रणोती नागनाथ जट्टे (97%)
द्वितीय – शुभांगी नागेश ढाले
तृतीय (संयुक्त) – अक्षरा सचिन बर्डे (95%) व साक्षी सुधाकर रोकडे (95%)
कार्यक्रमात पालक प्रतिनिधी शकील नदाफ व आसिफ वडवान यांनी महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध शिक्षणपद्धतीचे कौतुक केले. विद्यार्थिनी अक्षरा बर्डे हिने मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व बारावीमध्ये अधिक उज्वल यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन तुपकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत पाटील यांनी केले.





















