बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बाल वयातील मुलांना वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्याचे काम जन्मभूमी प्रतिष्ठानने केले आहे. प्रत्येक गावाच्या विकासासाठी जन्मभूमी प्रतिष्ठानसारख्या माध्यमांची समाजाला गरज आहे, असे मत आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी व्यक्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दत्तक घेतलेल्या धस पिंपळगावमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जन्मभूमी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या बाल व कुमारवयीन मुलांसाठीच्या वक्तृत्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ व जयंती सोहळ्यानिमित्त त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध व्याख्याते विशाल गरड, भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे, सरपंच तुळशीराम वायकर तसेच जन्मभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब धस, मा. सरपंच ज्ञानेश्वर भालेकर, नाना पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन सचिन धस, माजी सैनिक शरद जगदाळे, शितल राजमाने, विश्वजीत ठोंगे, मगनदास लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन झाल्यानंतर गावातील स्पर्धेतील मुलांच्या भाषणानंतर अंजना कृष्णा म्हणाल्या, दहा-बारा वर्षांची मुले गावातील व्यासपीठावर आत्मविश्वासाने बोलताना पाहिली. या मुलांना स्वतःला घडवायचे ही जाणीव मला त्यांच्या भाषणात दिसली. अशा छोट्या गावांमध्ये मुलांना एवढे मोठे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले आहे. गावातील सर्व कुटुंबे एकत्र करुन त्यांच्यासमोर विचार मंथन घडून आणण्याचे काम या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून झाले आहे.
यावेळी अंजना कृष्णा व मान्यवरांच्या हस्ते पहिली ते चौथी या वयोगटात सहभागी सर्व स्पर्धकांना प्रत्येकी ३०१ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच पाचवी ते सातवी मध्यम गटात प्रथम क्रमांक तेजस्वी हुंबे हिला तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात आले. द्वितीय क्र. समृद्धी मुळे या विद्यार्थिनीला २०००/- रु. व सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्र. विजेते सार्थक मुळे या विद्यार्थ्याला रु. १०००/- व सन्मानचिन्ह देण्यात आले. त्याचप्रमाणे आठवी ते दहावी मोठ्या गटातील प्रथम क्र. विजेती नम्रता बनसोडे या विद्यार्थिनीला रु. ३०००/- व सन्मानचिन्ह तसेच द्वितीय क्र. विजेता नागनाथ वाघमोडे या स्पर्धकाला रु.२०००/- व सन्मानचिन्ह व तृतीय क्र. विजेती भक्ती पाटील या विद्यार्थिनीला रु.१०००/- व सन्माचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काकासाहेब मुळे, शितल राजमाने, अविनाश पाटील यांनी काम पाहिले.
यावेळी व्याख्याते विशाल गरड यांनी आयपीएससारख्या अधिकारी या कार्यक्रमाला गावामध्ये येऊन मुलांना प्रोत्साहन देतात ही किमया जन्मभूमी प्रतिष्ठानने घडवली आहे, वक्तृत्व स्पर्धांसारखे उपक्रम शाळकरी मुलांना बालवयापासूनच गरजेचे असून यातूनच उद्याचा आयपीएस घडणार आहे. युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. गावाला नवी दिशा देणाऱ्या विचारांच्या मागे गावकऱ्यांनी उभे राहण्याची हीच खरी वेळ आहे. यातूनच गावाचे भले होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संयोजकाच्यावतीने सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव स्वप्निल धस यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब पाटील, संचालक वैभव जगदाळे, प्रवक्ते सुरत चंदनशिवे, धनु वाघमोडे, दादा कसबे, राहुल धस, महादेव मस्तूद, समाधान पवार, बापूराव लवटे आदींनी परिश्रम घेतले.
Post Views: 5