
सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती इंद्रजीत पवार यांनी महावितरणच्या सोलापूर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक वाडी-वस्त्यांवरील सिंगल फेज वीजपुरवठा बंद असल्याने नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक गावांमध्ये अपुऱ्या क्षमतेच्या डीपीमुळे कमी दाबाने वीजपुरवठा होत असून वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी महावितरण प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या.
यामध्ये बंद असलेला सिंगल फेज वीजपुरवठा तात्काळ सुरू करणे, प्रत्येक गावाच्या गरजेनुसार नवीन वितरण रोहित्रे (डीपी) उपलब्ध करून देणे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करणे तसेच आवश्यक ठिकाणी १०० केव्ही क्षमतेच्या नवीन डीपी मंजूर करून बसविण्याची मागणी करण्यात आली. कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांनी संबंधित सर्व मागण्यांची सकारात्मक दखल घेत प्राधान्याने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, उत्तर सोलापूर युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल सुतार, गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, अरुण बारसकर, श्याम शिंदे, अमोल बोराडे, अझर शेख, माजी सरपंच दत्ता पवार, प्रवीण लबडे, पिंटू कापसे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट
शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असून, वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू राहतील, अशी भूमिका इंद्रजीत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
चौकट :
मागण्याचे निवेदन
उत्तर सोलापूरच्या वीज समस्यांवर भर
वाडी-वस्त्यांवरील बंद सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी
प्रत्येक गावासाठी नवीन डीपी उपलब्ध करण्याचा आग्रह
वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर
आवश्यक ठिकाणी १०० केव्ही क्षमतेच्या डीपी मंजुरीची मागणी
Post Views: 15