मुंबई : स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाला तोंड देण्याच्या क्षमतेच्या विकासासाठी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला आहे. या उपक्रमांमुळे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन आणि खासगी क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विकासाचे फायदे समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचत आहेत. जलसंवर्धन, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने केलेले कार्य राज्याच्या विकास उद्दिष्टांना पूरक ठरत आहे. बँकेच्या विविध सामाजिक उपक्रमांच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ५२ टक्क्यांहून अधिक असून, जलसंधारण, आरोग्यसेवा आणि उपजीविका वृद्धी या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये; तसेच राज्यातील ७५ टक्के आकांक्षी जिल्ह्यांमध्ये हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत.
जलसुरक्षेसाठी व्यापक उपाययोजना
जलसुरक्षा उपक्रमांतर्गत १.०६ अब्ज लीटर गोड्या पाण्याची साठवण क्षमता निर्माण करण्यात आली असून, दुष्काळग्रस्त भागांमध्ये ४५ वॉटर एटीएमची स्थापना करण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील गावांसह राज्यातील २७१ गावांमध्ये जलसुरक्षा मजबूत करण्यात आली आहे; तसेच ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जलसंवर्धन उपाययोजना आणि हवामान-सुसंगत शेती तंत्रज्ञानासाठी मदत करण्यात आली आहे. हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याच्या दिशेने ७ लाख वृक्षांची लागवड हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना
रोजगारक्षमतेच्या क्षेत्रात ६ हजार ५९८ युवकांना कौशल्य विकास आणि रोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी ६३ टक्के युवकांना रोजगार मिळाला आहे. इलेक्ट्रिक वाहने, वाहन उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, बँकिंग आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १.६६ लाख रुपये इतके नोंदविण्यात आले आहे. या कार्यक्रमातील ६१ टक्के लाभार्थी महिला असून, ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना विशेष आर्थिक सहाय्य पुरविण्यात आले आहे. याशिवाय ७५८ महिला सूक्ष्म उद्योजिकांनाही मदत करण्यात आली आहे.
आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
आरोग्य क्षेत्रात बँकेच्या ‘सीईंग इज बिलिव्हिंग’ या प्रमुख उपक्रमांतर्गत ४ लाख ३९ हजार ६८८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर ३८ हजार ६२५ नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. राज्यभरात ४९ दृष्टी केंद्रांची स्थापना करण्यात आली असून, ही केंद्रे आता स्वयंपूर्ण पद्धतीने कार्यरत आहेत. या केंद्रांमधून दरवर्षी सुमारे १.६ कोटी रुपयांचे उत्पन्न निर्माण होत आहे. जिल्हा अंधत्व नियंत्रण संस्था आणि आयुष्मान भारत यांसारख्या शासकीय योजनांशी समन्वय साधून या उपक्रमांचा विस्तार करण्यात आला आहे.
स्टँडर्ड चार्टर्ड बँक, भारतच्या शाश्वतता विभागाच्या प्रमुख करुणा भाटिया यांनी सांगितले की, वंचित आणि दुर्लक्षित समुदायांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी बँक कटिबद्ध असून, महाराष्ट्रातील जलसुरक्षा, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातील उपक्रम ही दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीची प्रभावी उदाहरणे आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे हे उपक्रम शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनाला गती देणारे ठरत आहेत.


















