धाराशिव – धाराशिव शहरातील बार्शी नाका ते रेडिज क्लब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या महत्त्वाच्या मार्गाचे शासन नियमाप्रमाणे दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १५ मीटरप्रमाणे एकूण ३० मीटर रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सदर मार्ग हा धाराशिव शहरातील प्रमुख वाहतूक मार्ग असून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व वाहनांची ये-जा असते. वाढती लोकसंख्या व वाढती वाहतूक लक्षात घेता रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करणे आवश्यक आहे.
शासनाच्या नियमानुसार राज्य महामार्ग क्रमांक ६६ अंतर्गत येणाऱ्या या मार्गाची रुंदी दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १५ मीटर असणे अपेक्षित आहे. मात्र सध्याची रस्त्याची परिस्थिती पाहता वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सदर रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला आदेश देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व नियमानुसार ३० मीटर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाची दखल न घेतल्यास तात्काळ काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर ज्येष्ठ नेते बाबासाहेब बनसोडे, सुनील वाघमारे, महादेव माने, महादेव एडके, भीमराव कांबळे, धनंजय वाघमारे, समाधान सरवदे, विक्रम गायकवाड, रामकृष्ण वाघमारे यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Post Views: 13