बार्शी – शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, काढणी पश्चात होणारी नासाडी कमी व्हावी आणि मूल्यवर्धनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यशाळेचे उद्घाटन बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकेत NIPHT तळेगाव दाभाडेचे व्यवस्थापक श्री. रमेश घुले यांनी संस्थेच्या गेल्या २० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. भारतात दरवर्षी सुमारे ४०% फळे, भाजीपाला आणि अन्नधान्याची काढणी पश्चात नासाडी होते. ही नासाडी टाळून शेतमालावर प्रक्रिया करुन त्याला अधिक भाव मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे, असे ते म्हणाले.
तज्ञांचे मार्गदर्शन
डॉ. भिसे सर, विषय तज्ञ, फलोत्पादन, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर यांनी “द्राक्ष व आंबा उत्पादन तंत्रज्ञान” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “द्राक्षात घडाची प्रतवारी, बंच थिनिंग आणि गॅप फीलिंग यामुळे दर्जा सुधारतो. आंब्यात नियमित छाटणी, फळमाशी सापळे आणि बागेत स्वच्छता ठेवल्यास उत्पादनात २५% वाढ होते. काढणीनंतर ४ तासांच्या आत माल शीतगृहात नेणे आणि योग्य पॅकिंग केल्यास निर्यातीसाठी माल तयार होतो.
श्री. गणेश पाटील यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या योजना यावर माहिती दिली. ते म्हणाले, सोयाबीनसाठी जूनच्या पहिल्या १५ दिवसात पेरणी, प्रति एकर ३० किलो बियाणे आणि बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर २० दिवसांनी एक खुरपणी करावी. शेतकऱ्यांनी पी.एम. किसान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, अनुदानावर ठिबक सिंचन आणि पीक विमा योजनांचा लाभ घ्यावा.
श्रीमती ओसवाल, फळ व भाजीपाला प्रक्रिया तज्ञ, पुणे यांनी फळे आणि भाजीपाल्याची प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, द्राक्षापासून मनुका, आंब्यापासून पल्प आणि सोयाबीनपासून दुध, पनीर तयार करता येते. यासाठी कमी गुंतवणुकीत घरोघरी प्रक्रिया युनिट सुरू करता येतात. योग्य पॅकेजिंग आणि ब्रँडिंगमुळे स्थानिक बाजाराबरोबरच ऑनलाईन विक्रीलाही वाव मिळतो.
श्री. संतोष डोईफोडे, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे म्हणाले, शेतकऱ्यांनी आता केवळ उत्पादनावर भर न देता काढणी पश्चात व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ब्रोकोली, झुकीनी, लेट्यूस, चेरी टोमॅटो यांसारख्या परदेशी भाज्यांना शहरी बाजारात आणि हॉटेल्समध्ये मोठी मागणी आहे. या पिकांमधून कमी क्षेत्रात आणि कमी पाण्यात जास्त नफा मिळू शकतो. NIPHT तळेगाव दाभाडे मार्फत आम्ही शेतकऱ्यांना परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग आणि FSSAI परवाना यावर प्रशिक्षण देतो. तसेच प्रक्रिया युनिटसाठी प्रकल्प अहवाल आणि बँक कर्जासाठी तांत्रिक मदतही केली जाते. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या शेतमालाला अधिक भाव मिळवून द्यावा.
श्री. यतिन गुंडेकर यांनी संस्थेच्या प्रयोगशाळा, प्रशिक्षण सुविधा आणि उद्योजकता विकास कार्यक्रमांची माहिती दिली.
सभापती विजय गरड यांनी सांगितले की,शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि काढणीनंतर होणारी नासाडी थांबावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी नेहमीच प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने आयोजित केलेली ही प्रशिक्षण कार्यशाळा त्याच दृष्टीकोनातून घेण्यात आली. शेतकऱ्यांनी येथे दिलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून उत्पादनासोबतच साठवणूक, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाकडे लक्ष द्यावे. बाजार समितीच्या वतीने अशा तांत्रिक प्रशिक्षणांचे आयोजन भविष्यातही सुरू राहील आणि शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल..
सचिव तुकाराम जगदाळे यांनी सांगितले की,बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन वाढवण्यावरच नव्हे तर काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि योग्य पॅकेजिंगवरही भर द्यावा. त्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल आणि नासाडी टाळता येईल. बाजार समितीच्या वतीने आम्ही अशा उपयुक्त प्रशिक्षणांचे आयोजन पुढेही करत राहू आणि शेतकऱ्यांना तांत्रिक तसेच बाजारपेठेच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करु..
कार्यशाळेनंतर उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान आणि आभार व्यक्त केले. द्राक्ष, आंबा आणि सोयाबीनच्या आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाबरोबरच काढणी पश्चात साठवणूक आणि प्रक्रिया उद्योगाची माहिती शेतकऱ्यांना नवीन वाटली. परदेशी भाजीपाला लागवडीमुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळू शकते हे ऐकून अनेक शेतकऱ्यांनी अशा पिकांची लागवड करण्यास स्वारस्य दाखवले. तसेच शेतमालावर प्रक्रिया करून त्याला अधिक भाव मिळवून देता येईल याबत शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता दिसून आली. अशा प्रकारच्या तांत्रिक मार्गदर्शनपर कार्यशाळा भविष्यातही नियमितपणे घेण्यात याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
यावेळी बाजार समितीचे संचालक रामेश्वर पाटील, प्रविण गायकवाड, भरतेश गांधी, गजेंद्र मुकटे, सुरेश गुंड, प्रभाकर डमरे, यशवंत माने, अभिजीत कापसे, रविकांत साळुंखे, संजयकुमार माळी, नेताजी घायतिडक, अजित बारंगुळे, सतीश हनुमंते, सचिन बुरगुटे, सौ. मनिषा ताकभाते, सुमन पाटील आणि सचिव तुकाराम जगदाळे उपस्थित होते. बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Post Views: 12