पंढरपूर – आषाढी यात्रा कालावधीत राज्यासह देशभरातून लाखो वारकरी व भाविक पंढरपुरात येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
एस. कार्तीकेयन, जिल्हाधिकारी, सोलापूर तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दि.१७जुलै, रोजी सकाळी १० वाजता श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे मंदिर समितीचे कर्मचारी व स्वयंसेवक यांच्यासाठी दिवसभराचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये कशा प्रकारे तात्काळ प्रतिसाद द्यावा, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये प्रगत दोरीच्या सहाय्याने बचावकार्य, बंदिस्त जागेतील शोध व बचावकार्य, प्रथम प्रतिसादकर्त्याची भूमिका, हृदयक्रिया व श्वसनक्रिया पूर्ववत करण्याचे प्रशिक्षण (सीपीआर), जखमी व्यक्तीला सुरक्षितरीत्या उचलून नेण्याच्या पद्धती, सुरक्षित स्थलांतर, गर्दी व्यवस्थापन, प्राथमिक उपचार, आपत्कालीन बचावकार्य तसेच विविध आपत्तीच्या प्रसंगी समन्वय राखून कार्य करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी संभाजी कारले (अग्निशमन अधिकारी, पंढरपूर), डॉ. अनिल काळे (जिल्हा समन्वयक, १०८ रुग्णवाहिका सेवा, पंढरपूर), रामचंद्र वाघमारे (सचिव तथा प्रशिक्षक, सारथी युथ फाऊंडेशन, सोलापूर), बजरंग होटकर (प्रशिक्षक, इंडियन रेस्क्यू अकादमी, सोलापूर) तसेच साक्षी सर्वगोड (आपदा सखी, सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी १०८ रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून गर्दीच्या काळात भाविकांना अचानक हृदयविकाराचा झटका, श्वास घेण्यास त्रास होणे, बेशुद्धावस्था किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदत कशी करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. हृदयक्रिया व श्वसनक्रिया पूर्ववत करण्यासाठी करण्यात येणारे सीपीआर प्रशिक्षण, रुग्णाची प्राथमिक तपासणी, रुग्णाला सुरक्षितरीत्या हलविण्याच्या पद्धती तसेच रुग्णवाहिका येईपर्यंत आवश्यक प्रथमोपचार कसे द्यावेत, याबाबत डॉ. अनिल काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित कर्मचारी व स्वयंसेवकांनी या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत सराव केला.
प्रशिक्षणा दरम्यान आग लागल्यास करावयाची कार्यवाही, गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनांचे व्यवस्थापन, बंदिस्त जागेतील बचावकार्य, दोरीच्या सहाय्याने बचावकार्य, आपत्कालीन स्थलांतर, विविध यंत्रणांमधील समन्वय तसेच आपत्तीच्या प्रसंगी शांतपणे व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे महत्त्व याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात मंदिर समितीचे सुमारे २५० कर्मचारी व स्वयंसेवक सहभागी झाले. यात्रेदरम्यान दर्शन रांगा, मंदिर परिसर, भक्तनिवास, अन्नछत्र, दर्शनमंडप, वैद्यकीय मदत केंद्रे तसेच विविध सेवा केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भाविकांना अधिक सुरक्षित, तत्पर आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास त्याचा मोठा लाभ होणार आहे.
यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार, संजय कोकीळ, राजेश पिटले, भीमाशंकर सारवाडकर, विनोद पाटील, सावता हजारे, अतुल बक्षी, दशरथ देवकुळे, पांडुरंग बुरांडे, अमित नवाळे, राजेश तेलतुंबडे, चंद्रकांत कोळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी व सुधाकर घोडके यांनी केले. आषाढी यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीतील तात्काळ मदत व प्रभावी आपत्ती व्यवस्थापन यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असून, सुरक्षित आणि सुव्यवस्थित यात्रा पार पाडण्यासाठी मंदिर समिती कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Post Views: 9