पणजी : महाकवी कालिदास यांचे साहित्य भारतीय संस्कृती, निसर्गप्रेम आणि मानवी जीवनमूल्यांचा अमूल्य ठेवा असून, त्यांचा साहित्यवारसा जपण्यासाठी अभ्यास, वाचन आणि प्रचार-प्रसाराला चालना देणे ही काळाची गरज आहे. साहित्य हे समाजाला विचार, संस्कार आणि संवेदनशीलतेची दिशा देणारे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांनी केले.
गोव्यातील कोकण मराठी परिषद आयोजित ७८ व्या महाकवी कालिदास पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका मेघना कुरुंदवाडकर यांना महाकवी कालिदास पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ पाटील होते. यावेळी नारायण म्हाळे, सागर जाधवकर, शोभाताई मोरे, चित्रा भोसलेसार, इंद्रा देसाई यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोरे म्हणाले, महाकवी कालिदासांचे साहित्य केवळ संस्कृत भाषेपुरते मर्यादित नसून त्याचा प्रभाव जागतिक साहित्यविश्वावरही आहे. त्यांच्या साहित्याचे विविध भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले असून आजही ते अभ्यासकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. मराठी भाषेची समृद्ध परंपरा टिकवून ठेवण्यासाठी साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला दिलेला सन्मान आणि संतसाहित्यातून समाजाला लाभलेली मूल्ये यांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
पुरस्कार स्वीकारताना मेघना कुरुंदवाडकर म्हणाल्या, “महाकवी कालिदास पुरस्कार हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. लेखन हे केवळ अभिव्यक्तीचे साधन नसून समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. साहित्यामध्ये मानवी भावना, निसर्ग, प्रेम, जीवनसंघर्ष आणि संस्कार यांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी नव्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविणे अत्यंत आवश्यक आहे.”
प्रास्ताविकात सागर जाधवकर यांनी महाकवी कालिदास पुरस्काराच्या उद्देशाची माहिती देताना, यंदा या पुरस्काराचे ७८ वे वर्ष असल्याचे सांगितले. कालिदासांच्या साहित्याचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.