सोलापूर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्यावतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राध्यापक अनिल लोंढे, शाहीर साबळे यांचा गीतपुष्पांजली आदरांजली गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न होऊन या गीतगायनाच्या कार्यक्रमांमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे क्रांतिपिता वीर लहुजी साळवे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक गीत सादर करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती चे संस्थापक उत्तम प्रकाश खंदारे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छापर संदेश देताना सांगितले की,”अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य समाजाचे क्रांतिकारी शस्त्र आहे. तळागाळातील माणसाला यातून विद्रोह करण्यासाठी बळ मिळते. लढण्यास प्रेरणा मिळते. त्यांच्या साहित्यातून वास्तववादी विद्रोह झळकतो — आणि हेच त्यांचे साहित्य भारतीय समाजासाठी अत्यंत मौल्यवान बनवते.आजच्या समतेच्या, न्यायाच्या आणि परिवर्तनाच्या वाटचालीत अण्णा भाऊंचे साहित्य हे पथदर्शक आहे. म्हणूनच, अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालाच पाहिजे.”
यावेळी माजी मंत्री आणि मध्यवर्ती समितीचे संस्थापक उत्तम प्रकाश खंदारे, मध्यवर्ती चे विद्यमान अध्यक्ष साक्षांत लोखंडे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, पृथ्वीराज मोरे, विशाल लोंढे, वैशाली डोलारे, सुनील खवळे, दिलीपराव कांबळे, अनिल गवळी, लखन गायकवाड, खंडू बनसोडे अनिल बनसोडे, विक्रम कसबे आदी उपस्थित होते.



















