सोलापूर – विद्यार्थ्यांनी समाजाकडे डोळस दृष्टीने पहाणे आवश्यक आहे. केवळ पदवीचे शिक्षण न घेता कौशल्ययुक्त मुल्यवर्धीत शिक्षण घ्यावे. मुल्यवर्धीत शिक्षणातुनच सशक्त राष्ट्राचा विकास होतो. असे प्रतिपादन सोलापूर आकाशवाणी केंद्राचे प्रसारण अधिकारी डॉ. सोमेश्वर पाटील यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे आणि प्राचिन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य आणि नियुक्ती झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. सोमेश्वर पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासावी, विविध विषयांवरील माहिती समजून घ्यावी आणि चालू घडामोडींशी सातत्याने जोडलेले राहावे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता या गुणांना आजच्या स्पर्धात्मक युगात विशेष महत्त्व आहे. विद्यार्थीदशेत कौशल्यांचा विकास केल्यास भविष्यातील करिअरच्या संधी अधिक व्यापक होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. गौतम कांबळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमाकडे केवळ पदवी मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम म्हणून पाहावे, असा संदेशही त्यांनी दिला. विद्यापीठातील विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, संशोधनपर उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉ. प्रभाकर कोळेकर म्हणाले, विद्यापीठीन शिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित करावी. अभ्यासातील विषय समजून घेताना त्यामागील सामाजिक संदर्भ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून एखाद्या समस्येचा अभ्यास करताना वस्तुनिष्ठता, चिकित्सकता आणि संवेदनशीलता या बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज ढावरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका जाधव आणि आयुषी जुनवणे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख कुणाल बाबरे यांनी तर आभार सागर वाघमारे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















