पंढरपूर – पंढरपूर नगरपालिकेने शहरातील विठ्ठल मंदिर परिसर, नगरप्रदक्षिणा मार्ग येथे अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु केली आहे. पोलिस बंदोबस्ता मध्ये कारवाई केल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पालिकेच्या कारवाईमुळे सध्या मंदिर परिसरातील रस्ते प्रशस्त आणि मोकळे वाटू लागले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसह भाविकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.
सध्या अधिकमास सुरु असल्यामुळे पंढरपूरात दररोज भाविकांची मांदियाळीआहे. भाविकांच्या गर्दीमुळे शहरात वारंवार वाहतूकीची कोंडी निमार्ण होत होती. विठ्ठलरुक्मिणी मंदिर परिसरात तर अतिक्रमणामुळे भाविकांना रस्त्यावरुन चालणे देखील जिकरिचे होवून बसले होते. मंदिर परिसरात तात्पुरत्या व्यापाऱ्यांनी चक्क रस्त्यांवरच मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण करुन अक्षरश: रस्ते व्यापुन टाकले होते. या तात्पुरत्या स्वरुपात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे मंदिर परिसरातील कायमस्वरुपी दुकानदार देखील वैतागून गेलेले होते. कारण कायमस्वरुपी दुकानां समोर हातगाडे लावून ही मंडळी आपले व्यवसाय करीत होती. दरम्यान अधिक
मास त्यामुळे होणारी भाविकांची गर्दी तसेच गर्दी आणि अतिक्रमणामुळे वारंवार होणारी वाहतूकीची कोंडी यामुळे शहरातील नागरिकां बरोबरच परगावाहून येणारे भाविक देखील वैतागून गेलेले होते. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पोलिसांच्या मदतीने शहरात बुधवार पासून अतिक्रमण विरोध मोहिमेस प्रारंभ केला. स्वत: मुख्याधिकारी तसेच येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे जातीने रस्त्यावर थांबुन अतिक्रमणे काढण्याचे आवाहन करीत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे अतिक्रमण पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना देखील अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांकडून फारसा विरोध होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसरातील रस्ते, नगरप्रदक्षिणा मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा आदी रस्ते आता मोकळे दिसु लागलेले आहेत.
दरम्यान पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे शहरातील नागरिकांबरोबरच भाविकांची देखील रस्त्यांवरील अतिक्रमणे निघाल्यामुळे जाण्या येण्याची चांगली सोय होवू लागली आहे. ही अतिक्रमण मोहिम काही दिवसांपूर्तीच राबवु नये. त्यामध्ये सातत्य ठेवावे नाही तर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पुन्हा अतिक्रमणे करुन रस्त्यांवर अडथळे निर्माण केले जावू शकतात. त्यामुळे पालिकेकडून अतिक्रमण विरोधी मोहिमे मध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे शहरातील सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे. पालिकेने पोलिसांच्या सहकार्याने अधिक महिन्याच्या वाढत्या गर्दीमुळे शहरात सुरु केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाई बद्दल शहरातील नागरिक तसेच भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
——————-
चौकट : ( गंध लावणाऱ्या मुलांचा होतो उपद्रव )
विठ्ठल मंदिर परिसरात गंध लावण्याऱ्या मुलांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली दिसत आहे. ही मुले विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमालीचे हैराण करताना दिसतात. त्यामुळे अनेक वेळा भाविकांना या मुलांकडून नाहक त्रास दिला जातो. अनेकदा वादाचे प्रसंग देखील उद्भविताना दिसून येतात. त्यामुळे पोलिसांनी गंध लावणाऱ्या मुलांना देखील शिस्त लावण्याची गरज असल्याचे भाविकांमधून बोलले जात आहे.
—————-
चौकट : ( अतिक्रमण पथकाने कायमच दक्ष्षता घ्यावी )
पालिकेकडून पोलिसांच्या सहकार्याने
अतिक्रमण विरोधी मोहिम राबविल्यामुळे शहरातील मंदिर परिसरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ लागल्याचे दिसत आहे. मात्र पालिकेच्याअतिक्रमण विरोधी पथकाने सातत्याने अशा प्रकारे मंदिर परिसरात फिरुन अतिक्रमणे होणारनाहीत, फेरीवाले लोक रस्ता व्यापून आपल्या व्यवसाय करणार नाहीत, हातगाड़ी वाले मंडळीरस्त्यावर हातगाड्या लावून आपल्या मालाची विक्री करणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे.जर पालिकडून दुर्लक्ष झाले तर लगेचच व्यापारी पुन्हा अतिक्रमण करुन रस्ता व्यापुन टाकण्यासमागेपुढे पहात नाहीत. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कायमच दक्ष राहून कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे.
Post Views: 6