नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर (हिं.स.) : बांगलादेशात इस्लामिक कट्टरवाद्यांकडून तेथील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार त्वरीत थांबवावेत अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. यासंदर्भात संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंनी निवेदन जारी केले असून इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांच्या मुक्ततेची मागणी देखील संघाने केली आहे.
यासंदर्भातील निवेदनता होसबळे म्हणाले की, बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथीयांकडून महिलांवर होणारे हल्ले, खून, लूटमार, जाळपोळ आणि अमानुष अत्याचार हे अत्यंत चिंताजनक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचा निषेध करतो. सध्याचे बांगलादेश सरकार आणि इतर यंत्रणा हे थांबवण्याऐवजी केवळ मूक प्रेक्षक बनले आहेत.
बळजबरीने बांगलादेशातील हिंदूंच्या आत्मरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठलेला आवाज दाबून टाकण्यासाठी त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचाराचे नवे पर्व सुरू होत असल्याचे दिसते. अशा शांततापूर्ण आंदोलनात हिंदूंचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉन साधू चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात पाठवणे बांगलादेश सरकारने अन्यायकारक आहे.बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत आणि चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून सुटका करावी,
असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेश सरकारला केले आहे. बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्याच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलावीत, असे आवाहनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारत सरकारला करतो. या कठीण प्रसंगात भारत आणि जागतिक समुदाय आणि संघटनांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे समर्थन व्यक्त केले पाहिजे आणि जागतिक शांतता आणि बंधुता यासाठी आपापल्या सरकारांकडून शक्य ते प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे होसबळे यांनी म्हंटले आहे.