बार्शी – सोलापूर ग्रामीणमधील बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदे आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती, मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. स्वतःच्याच आई-वडिलांनी आणि नातेवाइकांनी या अल्पवयीन मुलीचा छळ करुन तिचा जबरदस्तीने बालविवाह लावल्याचे आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांसह एकूण १६ जणांवर ‘पोक्सो’ आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून ३ मुख्य आरोपींना अटक केली आहे.
१० जून २०२६ रोजी बार्शी तालुक्यातील एका रहिवाशाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्याची १६ वर्षीय मुलगी मामाच्या गावी उन्हाळ्याच्या सुट्टीत गेली असता, एका काळ्या रंगाच्या ‘थार’ जीपमधून आलेल्या अज्ञात इसमाने तिचे आमिष दाखवून अपहरण केले. या तक्रारीवरुन पोलिसांनी सुरुवातीला भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत पीडित मुलीला शोधून काढले. ११ जून २०२६ रोजी पीडित मुलगी पोलिसांसमोर हजर झाली. महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर तिने दिलेल्या कायदेशीर जबाबाने पोलिसांनाही धक्का बसला.
पीडितेचे गावातील एका तरुणावर प्रेम होते, ज्याला तिच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता. पीडितेचे वय कमी असताना आणि तिला पुढे शिकायचे असतानाही, तिच्या आई-वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह एका नातेवाईक तरुणाशी ठरवला.
२८ डिसेंबर २०२५ रोजी नातेवाइकांच्या घरी पीडितेचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. पीडितेने लग्नाला विरोध केला असता, तिला फसवून “फक्त साखरपुडा करत आहोत” असे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात त्याच दिवशी तिचा जबरदस्तीने बालविवाह लावून देण्यात आला.
सासरच्या घरात लैंगिक आणि मानसिक छळ विवाह झाल्यानंतर पीडितेला कथित पतीसोबत राहण्यास भाग पाडण्यात आले, जिथे तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार करण्यात आला. पीडितेने या छळाबाबत आपल्या आई-वडील आणि सासरच्या लोकांना सांगितले, परंतु त्यांनी तिच्या तक्रारीची दखल न घेता तिलाच गप्प राहण्यास सांगितले. अखेर या रोजच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने तिच्या एका मित्राला मदतीसाठी फोन केला. तो मित्र काळ्या रंगाच्या थार गाडीतून आला आणि पीडिता तिच्या स्वतःच्या मर्जीने सासरहून निघून गेली.
पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिचा बालविवाह लावल्यामुळे आणि लैंगिक छळ केल्यामुळे पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन
भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३: कलम ६४ (बलात्कार), कलम ६५ (अल्पवयीन मुलीवरील बलात्कार), कलम १३७ (२) (अपहरण) आणि कलम ३ (५) (समान उद्देश), पोक्सो कायदा (POCSO Act), २०१२: कलम ४, ६, ८, १२, १७ (अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि त्याला प्रवृत्त करणे), बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६: कलम १० आणि ११ (बालविवाहाला चालना देणे, ठरवणे आणि विवाह लावून देणे) या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शी तालुका पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत या प्रकरणातील ३ मुख्य आरोपींना (ज्यामध्ये पीडितेला वाहनातून घेऊन जाणारा तिचा मित्र, तिचे कायदेशीर वडील आणि सासरा) १२ जून २०२६ रोजी पहाटे अटक केली आहे.
तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सी. जी. घोळवे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, “फरार असलेला कथित पती आणि बेकायदेशीर बालविवाह लावून देणारा पुरोहित यांचा शोध घेणे, तसेच गुन्ह्यात वापरलेली थार गाडी जप्त करण्यासाठी आरोपींची कोठडी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.” न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत अटक केलेल्या ३ आरोपींना १५ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
स्वतःच्याच मुलीला बालविवाहाच्या खाईत लोटणाऱ्या पालकांवरच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण ब तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.
Post Views: 8