सोलापूर : जैन धर्मातील संयम, त्याग आणि आत्मशुद्धीचे सर्वोच्च प्रतीक मानला जाणारा केशलोंच विधी आज अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि आध्यात्मिक वातावरणात झाला. ‘युगशिरोमणी’ म्हणून विख्यात आचार्य विद्यासागर जी महाराज यांचे परम शिष्य, निर्यापक श्रमण १०८ श्री वीरसागरजी महाराज यांचा हा विधी आदिनाथ मंदिर, त्यागी निवास येथे पार पडला.
केशलोंच ही केवळ शारीरिक क्रिया नसून आत्मसंयम, सहनशीलता आणि वैराग्याची पराकाष्ठा मानली जाते. देहाभिमानाचा त्याग करून आत्मसाधनेकडे वाटचाल करण्याचा हा एक उच्च आध्यात्मिक साधना-प्रयोग आहे. जैन तत्त्वज्ञानातील अपरिग्रह, संयम आणि तप या मूल्यांचे जिवंत प्रतीक म्हणून या विधीकडे पाहिले जाते.
विधीपूर्वी मुनीश्री शरीरावर पवित्र राख लावतात आणि त्यानंतर स्वतःच्या हातांनी केस झुबक्यांमध्ये उपटतात. ‘जैन’ हा शब्द ‘जिन’ या संकल्पनेतून उद्भवलेला असून, ‘जिन’ म्हणजे आपल्या मनावर आणि इंद्रियांवर विजय मिळवणारा. अशा आत्मविजयी साधकांच्या परंपरेत दिगंबर मुनीश्रींचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले जाते.
दिगंबर मुनी २२ परिषह (कठीण परिस्थिती) शांतपणे सहन करतात आणि २८ मूलगुणांचे कठोर पालन करतात. केशलोंच करताना सूक्ष्म जीवांची हिंसा टाळणे अशक्य असल्याने, त्या दिवसाचे प्रायश्चित्त म्हणून मुनीश्री उपवास पाळतात. त्यामुळे अहिंसा, करुणा आणि आत्मशुद्धी यांचे सर्वोच्च पालन त्यांच्या आचरणातून प्रकर्षाने दिसून येते. ते स्वतः निर्भय राहून सर्व जीवांना निर्भयतेचा संदेश देतात.
विशेष म्हणजे, निर्यापक श्रमण श्री वीरसागरजी महाराज दर दोन महिन्यांनी ही कठोर तपश्चर्या नियमितपणे करतात. त्यांच्या सातत्यपूर्ण साधनेतून अध्यात्मिक स्थैर्य, अनुशासन आणि आत्मबल यांचे विलक्षण दर्शन घडते.
या पवित्र प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रावक-श्राविकांनी भावपूर्ण दर्शन घेत आत्मिक उन्नतीचा अनुभव घेतला. या विधीमुळे सोलापुरात जैन धर्माच्या महान तपपरंपरेची पुनःप्रचिती झाली असून, समाजात संयम, साधेपणा आणि आत्मोन्नतीच्या मूल्यांचा प्रेरणादायी संदेश अधिक दृढ झाला आहे.

















