सोलापूर – सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या उपक्रमाच्या माध्यमातून हरित, संतुलित आणि शाश्वत भविष्याच्या निर्मितीसाठी हुडको कॉलनी समोर, ७० फूट रोड येथील सोलापूर महानगरपालिका मुलांची मराठी शाळा क्र.५ या शाळेच्या जवळ-जवळ १ एकर पटांगणाच्या वॉल कंपाऊंडला लागून सकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत वड, पिंपळ, लिंब, अशोक जांभूळ, कारंजी इ. जातीचे ८५ रोपे लावण्यात आली.
याप्रसंगी माजी महापौर सौ. श्रीकांचना यन्नम, नगरसेविका सौ. जयश्री दोडमणी, बालकल्याण समिती सोलापूरच्या सदस्या ॲड. सुवर्णा कोकरे, आरंभ फाउंडेशनचे यशवंत पाथरूट यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांचे मनोगत असे होते की, उन्हाचे चटके कमी करावयाचे झाल्यास, सोलापूरला ‘ग्रीन सिटी’ करावी लागेल. त्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे. संत निरंकारी मिशन आपल्या परीने प्रयत्न करत आहेच, त्यासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे. झाडे लावण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. वृक्ष लागवड ही पुढील पिढीसाठी गुंतवणूक आहे. निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे. प्रत्येकाने प्रयत्न केल्यास निसर्गाचे जतन होणार आहे. झाडे लावून वाढदिवस साजरा करणे हा निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी दिलेला संदेश स्तुत्य आहे.
आभार प्रकट करताना सोलापूरचे क्षेत्रिय प्रभारी इंद्रपालसिंह नागपाल म्हणाले की, सतगुरु माता सुदिक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वननेस – वन’ या परीयोजनेची २०२१ मध्ये सुरुवात झाली. आजचे हे ६वे वर्ष आहे. आज भारतातील विविध राज्यातील ६०० हून अधिक ठिकाणी या परियोजनेचे आयोजन करण्यात आले असून, आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही सेवा घडत आहे.
या कार्यक्रमासाठी सोलापूर महानगरपालिका शाळा क्र.५ चे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व सेवादल युनिट नं.४९३ यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 22