सोलापूर – गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा अखेर पूर्ण झाला असून, पवित्र पोर्टलद्वारे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच खासगी प्राथमिक शाळांना मिळून ४०० हून अधिक नव्या शिक्षकांची निवड झाली आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी झालेल्या या निवडीमुळे शिक्षकांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या अनेक शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, उर्दू आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये आवश्यक शिक्षक उपलब्ध झाले आहेत का, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीची निवड यादी गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत विविध व्यवस्थापनांच्या १९ हजार ७५४ पदांपैकी १३ हजार १२९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेसह जिल्हा परिषद अंतर्गत खासगी प्राथमिक शाळा, नगरपालिका, महानगरपालिका आणि अन्य व्यवस्थापनांच्या शाळांसाठी ४०० पेक्षा अधिक शिक्षकांची निवड झाली आहे. यामध्ये पहिली ते पाचवीसाठी शिक्षक तसेच सहावी ते आठवीसाठी पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नियमित आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन मिळण्यास मदत होणार आहे. विशेषतः शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी असलेल्या शाळांना या नियुक्त्यांमुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
चौकट
मात्र उर्दू-कन्नड माध्यमांचा प्रश्न कायम
सर्वसाधारण प्रवाहातील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर निवड झाली असली तरी उर्दू आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांची गरज कितपत पूर्ण झाली, याकडे आता शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. माध्यमनिहाय आणि विषयानुसार शिक्षक उपलब्ध नसतील, तर केवळ एकूण शिक्षकसंख्या वाढल्याने त्या शाळांमधील अध्यापनाची समस्या सुटणार नाही. त्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांचे माध्यम, विषय, शाळा आणि रिक्त पदांशी जुळणारे नियोजन करून नियुक्ती प्रक्रिया राबविणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
राज्यात १३ हजारांवर उमेदवारांची शिफारस
राज्यातील विविध व्यवस्थापनांच्या १९ हजार ७५४ उपलब्ध पदांसाठी पवित्र पोर्टलवर प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले होते. त्यापैकी १३ हजार १२९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.यामध्ये पहिली ते पाचवीसाठी ७ हजार ५४१, सहावी ते आठवीसाठी ४ हजार २०७, नववी ते दहावीसाठी १ हजार ११९, तर अकरावी ते बारावीच्या वर्गांसाठी २५२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
चौकट
रिक्त जागांसाठी ‘कन्व्हर्टेड राउंड’
समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे राज्यातील माजी सैनिक प्रवर्गातील २ हजार ७६० आणि अंशकालीन प्रवर्गातील १ हजार ७६० पदे रिक्त राहिली आहेत. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ आणि पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची १ हजार ४०८ पदे रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी पुढील टप्प्यात ‘कन्व्हर्टेड राउंड’ अर्थात समांतर आरक्षणातील रिक्त जागांचे रूपांतर करून भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात संधी न मिळालेल्या उमेदवारांसाठी पुढील फेरी महत्त्वाची ठरणार आहे.
चौकट
नियुक्त्या आचारसंहितेपूर्वी पूर्ण करण्याची मागणी
“गेल्या वर्षभरापासून राज्यातील हजारो उमेदवार शिक्षक भरतीची प्रतीक्षा करीत होते. अखेर पहिल्या टप्प्यात जवळपास १३ हजार उमेदवारांची निवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही ४०० हून अधिक उमेदवारांची निवड झाली आहे. आता कागदपत्रांची पडताळणी, समुपदेशन आणि शाळा निवडीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या द्याव्यात, अशी आमची मागणी आहे. त्यानंतर कन्व्हर्टेड राउंडमधील जागाही रिक्त न ठेवता पुढील महिन्यात भराव्यात. त्यामुळे अधिक उमेदवारांना संधी मिळेल आणि ग्रामीण भागातील शाळांना आवश्यक शिक्षक उपलब्ध होतील,” असे डि.एड.-बी.एड. असोसिएशन/पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी सांगितले.
चौकट
आता प्रशासनासमोर तीन महत्त्वाची कामे
निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, समुपदेशन व शाळा निवड, तातडीने नियुक्ती, या तीन टप्प्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याबरोबरच उर्दू-कन्नडसह प्रत्येक माध्यमातील आणि विषयातील शिक्षकांची वास्तविक गरज तपासून पदस्थापना करणे आवश्यक आहे. अन्यथा एकीकडे शिक्षकांची मोठ्या संख्येने नियुक्ती होऊनही दुसरीकडे काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम राहण्याची शक्यता आहे.
Post Views: 14