पंढरपूर – ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांसह आगामी गाळप हंगामातील ऊसदराच्या प्रश्नावर ऊस दर संघर्ष समितीची माढा येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मागील गाळप हंगामातील थकीत ऊस बिले तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांचा ऊस घेऊन त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखानदारांना आता जाब विचारला जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
तसेच आगामी गाळप हंगामात पहिली उचल किती देणार हे स्पष्टपणे जाहीर केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याने धुराडे पेटवू नयेत, अशी ठाम भूमिका बैठकीत घेण्यात आली. शेतकऱ्यांना दराबाबत अंधारात ठेवून गाळप सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला संघटितपणे विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला.
याशिवाय गावभेट दौरे आयोजित करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावागावात जाऊन थकीत ऊस बिले, आगामी ऊसदर, पहिली उचल आणि शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे.
“थकीत ऊस बिल मिळालेच पाहिजे, पहिली उचल जाहीर झालीच पाहिजे आणि शेतकऱ्याला त्याच्या उसाला योग्य व उच्चांकी दर मिळालाच पाहिजे. अन्यथा कारखानदारांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष केला जाईल,” असा इशारा ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.
बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत, शिवसेना, रासप यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दीपक भोसले, सचिन पाटील, निवास नागणे, अमोल वेदपाठक,चंद्रकांत बागल, शिवाजीभाऊ पाटील, बापू गायकवाड मेजर, सुहास पाटील, अभिजीत साठे, अजित परबत, सत्यवान गायकवाड, देविदास खरात, मालोजी आडकर, मुस्तफा काझी, बालाजी चव्हाण, अतुल माने-पाटील, गोरख वाकडे, सचिन खैरे, बळीराम गायकवाड, वैभव साळुंखे, भागवत मुकणे, विलास उबाळे, नवनाथ उबाळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 5