टेंभुर्णी – बैलपोळा सणानिमित्त बैलांची मिरवणूक सुरू असताना टेंभुर्णी-पंढरपूर रोडलगत असलेल्या परिते (ता. माढा) येथे गर्दीच्या ठिकाणी रायफलमधून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मिरवणुकीत काही काळ खळबळ उडाली. याप्रकरणी विजयसिंह पृथ्वीराज पाटील (रा. परिते, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 125 तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 25(9) अन्वये टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी बैलपोळा सणानिमित्त परिते परिसरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी-पंढरपूर रोडलगत असलेल्या परितेवाडी येथील मारुती मंदिराजवळ मिरवणुकीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याचवेळी विजयसिंह पृथ्वीराज पाटील याने स्वतःच्या ताब्यातील रायफलमध्ये राउंड लोड करून ती आकाशाच्या दिशेने पकडत हवेत फायर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
गर्दीच्या ठिकाणी रायफलमधून गोळीबार झाल्याने उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सणाच्या उत्साहात अचानक बंदुकीचा आवाज घुमल्याने नागरिकांमध्ये या प्रकाराची चर्चा सुरू झाली. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्राचा वापर करून हवेत गोळीबार केल्याने स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
बैलपोळा हा शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पारंपरिक महत्त्वाचा सण आहे. बैलांची सजावट, मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर आणि उत्साहाच्या वातावरणात नागरिक सहभागी झाले असताना रायफलच्या गोळीबाराचा प्रकार घडल्याने सणाच्या उत्साहाला वेगळेच वळण मिळाले. ‘पोळ्याचा सण की बंदुकीचा बार?’ असा प्रश्नही या घटनेनंतर नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
दरम्यान, या घटनेवर चर्चा सुरू असताना एका शेतकऱ्याने पोलिसाला विचारले, “साहेब, परितेवाडीत गोळीबाराचा आवाज आला की ओ?” त्यावर पोलीस म्हणाला, “आरं गप की… पोळ्याचा सण हाय ना! मग मोठ्ठा लवंगी फटाका लावला असंल!” हा उपरोधिक संवाद सध्या परिसरातील चर्चेचा विषय ठरत असला तरी प्रत्यक्षात गर्दीच्या ठिकाणी शस्त्रातून गोळीबार होणे हा गंभीर प्रकार असल्याने नागरिकांकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून विविध स्तरांवर बैठका घेऊन नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, मंडळांचे पदाधिकारी व संबंधित घटकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात. गणेशोत्सव असो, यात्रा असो किंवा इतर धार्मिक-सामाजिक कार्यक्रम असोत, गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले जातात.
मात्र, पोलिसांकडून बैठका घेऊन सूचना दिल्या जात असतानाही काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची पर्वा न करता असे प्रकार करीत असतील, तर प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. योग्य वेळी योग्य कारवाई झाली, तर अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता कमी होते, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोहेकॉ/497 दत्तात्रय महादेव वाघमारे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7.21 वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 685/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/1575 दशरथ बोबडे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही हेड कॉन्स्टेबल 1675 पंढरीनाथ आरकिले यांनी केली आहे.
सण-उत्सव हे आनंद आणि सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी असतात. अशा कार्यक्रमांमध्ये शस्त्रांचे प्रदर्शन अथवा गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यावर वेळीच कठोर प्रतिबंधात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे “कायद्याचा बार फुसका, पुढाऱ्यांचा बार पक्का” असे म्हणण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने अशा प्रकारांकडे गांभीर्याने पाहून वेळीच कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Post Views: 14