नांदेड – येथील गोविंद सोमानी व सौ. सुमन सोमानी हे मूळतः शहरी जीवन जगणारे, सुस्थितीत व्यवसाय असलेले कुटुंब. नांदेड शहरात गोविंद सोमानी यांचा होलसेल प्लायवूड व ग्लास विक्रीचा मोठा व्यवसाय असून त्यांचे नाव शहरात मानाचे आहे. कुटुंबात तीन मुले, एक मुलगी व सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे. माहेश्वरी समाजात राहून त्यांनी सामाजिक कार्याची परंपरा जपली.
गोविंदजींचे वडील कन्हैयालाल सोमानी यांच्याकडूनच त्यांना सेवाभावी संस्कारांची देणगी मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला संपर्क, तसेच विविध कार्यकर्त्यांशी आलेली ओळख यामुळे त्यांच्या मनात समाजकार्याची बीजे रोवली गेली. नांदेडमधील संघ कार्यकर्ते राजेश्वरजी कमतलवार व पूर्णवेळ कार्यकर्ते रावसाहेब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून त्यांना यमगरवाडी प्रकल्पाची माहिती मिळाली आणि तेथील कार्याने ते प्रेरित झाले.
व्यवसायाचा मोठा व्याप आणि कुटुंबाची जबाबदारी असूनही, समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. परिवाराशी चर्चा करून, मुलांच्या संमतीने त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील यमगरवाडी येथे पूर्णवेळ सेवावृत्ती म्हणून जाण्याचा निर्धार केला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेक अयाचित यांनीही त्यांना प्रेरणा देऊन या कार्यात सहभागी करून घेतले.
गेल्या तीन वर्षांपासून गोविंद सोमानी व सुमन सोमानी हे यमगरवाडी प्रकल्पात पूर्णवेळ सेवा देत आहेत. शहरातील जीवन सोडून, भटक्या-विमुक्त समाजातील मुलांमध्ये राहून त्यांनी एक वेगळेच जीवन अनुभवले. या समाजाची परिस्थिती, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या जीवनातील वास्तव याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आपल्या सेवेला अधिक समर्पित केले.
गोविंद सोमानी यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चांगल्या सवयी आणि शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विशेषतः अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय रुजवण्यासाठी त्यांनी शाळेत “बचत बँक” आणि “ग्राहक भांडार” सुरू केले. या उपक्रमांचे व्यवस्थापन विद्यार्थी स्वतः करत असल्याने त्यांच्यात जबाबदारीची भावना विकसित झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या छोट्या-छोट्या गरजांपासून ते त्यांच्या भावनिक आधारापर्यंत, सोमानी काका सदैव त्यांच्या सोबत राहिले. त्यामुळेच विद्यार्थी व कर्मचारी त्यांना प्रेमाने “सोमानी काका” म्हणून ओळखतात. सुमन सोमानी यांनी मुलींमध्ये शिस्त, संस्कार आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोलाचे कार्य केले.
या सेवाकाळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवराव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक अयाचित तसेच इतर सहकाऱ्यांकडूनही त्यांना प्रेरणा मिळाली.
या काळात त्यांच्या नातवंडांची आठवण त्यांना वारंवार येत राहिली. नातवंडेही त्यांना घरी येण्याची विनंती करत असत. मात्र, सेवेला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी तीन वर्षे अखंडपणे कार्य केले.
आज त्यांच्या या सेवाव्रताला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आता ते सेवावृत्ती थांबवत असले तरी, भटक्या-विमुक्त समाजासाठी पुढेही काहीतरी करण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.
शहरी सुखसोयींचा त्याग करून, दुर्गम भागात जाऊन समाजासाठी काम करणे ही खरोखरच दुर्मिळ व प्रेरणादायी गोष्ट आहे. गोविंद सोमानी व सुमन सोमानी यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीला मनापासून सलाम.
विठ्ठल म्हेत्रे – मुख्याध्यापक
एकलव्य विद्या संकुल,यमगरवाडी
ता. तुळजापूर, जि. धाराशिव


























