सोलापूर : शहरातील श्री कृष्णा रायरा मठातर्फे शनिवार दि. २ मे रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा कर्णिक नगर परिसरातील जुन्या वालचंद कॉलेजजवळील चिल्ड्रन पार्क शेजारील मैदानावर पार पडणार असल्याची माहिती पुरुषोत्तम धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मठाचे प्रमुख श्री श्री श्री स्वामी कमलनाथ प्रसादा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मानवतेच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीच्या प्रार्थनेसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाची सुरुवात पहाटे ५ वाजता पुण्याहवाचनाने होणार असून रात्री १० वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. श्री श्रीमुष्णम राघवेंद्र आचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात सर्व विधी संपन्न होतील.
‘श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव’ हा भगवान वेंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या प्रतीकात्मक विवाह सोहळ्याचे दर्शन घडवणारा एक पवित्र उत्सव आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.
या उत्सवात वरपूजा, कन्यादान, मंगलसूत्र बांधणे, अक्षता, आरती व प्रसाद वितरण यांसह तैलाभ्यंजन, महापंचामृत पूजा, नीजपाद दर्शन, तोमाला सेवा असे विविध विधी पार पडणार आहेत.या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदकिशोर रामकिशन धूत (एन.आर. ग्रुप) आणि डॉ. सूर्यप्रकाश कोठे हे विशेष सेवा कर्ते म्हणून कार्यरत आहेत. तसेच माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, खजिनदार लक्ष्मण करली व त्यांच्या मित्रपरिवाराच्या पुढाकारातून हा सोहळा सोलापुरात आयोजित करण्यात येत आहे. सल्लागार समितीत गौतम संचेती यांचा सहभाग आहे, असे पुरुषोत्तम धूत यांनी सांगितले.
भक्ती, श्रद्धा आणि दैवी एकात्मतेचा अनुभव देणाऱ्या या महोत्सवात अधिकाधिक भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून श्रीनिवासा भगवानाचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन उत्सवाचे अध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, उपाध्यक्ष नरेश बोल्लू, मंदार कुलकर्णी व लक्ष्मण करली यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस श्रीनिवास करली, व्यंकटेश चिल्का, डॉ. हिरालाल अग्रवाल आदी उपस्थित होते.


























