पंढरपूर – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दिवसांमागून दिवस आणि वर्षामागून वर्षे कशी निघून जातात हे कोणालाही कळत नाही. कोँणत्याही व्यक्तीला स्वत:च्या आयुष्यातील वर्तमाना बरोबरच भूतकाळ, आणि भविष्या बद्दल देखील जिज्ञासा असतेच. काळ झपाट्याने पुढे सरकत असतो. त्यामुळे चालू आयुष्या बरोबरच सरलेल्या आयुष्यातील गोड आणि कडू आठवणीच्या शिदोरीवरच प्रत्येकजण भविष्याचा वेध घेत असतो. यातच आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यास प्रत्येकालाच आनंदच होतोच होतो.
सध्या एआय तंत्रज्ञानामुळे ही संधी प्रत्येकाला उपलब्ध झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे ८०च्या दशकातील आपले रूप कसे होते, याचा जणू आरसाच सध्या एआयने समोर ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपासून अगदी व्हीआयपी मंडळी, राजकारणी ते सेलिब्रिटी पर्यंत सर्वांचीच एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन सोशलमिडीयाव्दारे आपले जुने रुप कसे होते हे न्हाळ्याची जणू स्पर्धाच सुरु असल्याचे सध्या दिसत आहे.
एकीकडे हे नवीन तंत्रज्ञान आपणाला नुसतेच छायाचित्रांच्या स्वरुपात त्या काळात घेऊन जाते. मात्र तो काळ प्रत्यक्ष अनुभविलेले, पाहिलेले अनेक जण मात्र त्या काळातील गोड आठवणींनी आज देखील गहिवररुन जातात. कारण तो काळ म्हणजे नवीन तंत्रज्ञानाची केवळ सुरुवात होती.. त्यामुळे आज जरी विविध तंत्रज्ञानाची निर्मिती झालेली असली तरी तंत्रज्ञानाने नुसती जुनी छायाचित्रे तयार होतात. मात्र तो काळ पुन्हा अनुभवता येण्याची किमया अजून तरी कोणत्याही तंत्रज्ञानातून तयार झालेले दिसत नाही. त्यामुळे केवळ त्या काळचे छायाचित्र पाहून त्या वेळच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर पुढच्या आयुष्याची वाट धरावयाची.. ऐवढेच..
—————-
चौकट : ( संपुर्ण जग एक बनत आहे ग्लोबल खेडे )
आज संपूर्ण जग एक ग्लोबल खेडे झाले असून सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड व्हायरल होत आहेत. ८०-९०च्या दशकातील कपडे, घराची रचना, जुन्या काळातील फोटोसेशन आणि त्या वेळची जीवनशैली आजची तरुणाई एआयच्या माध्यमातून पुन्हा अनुभवत आहे. त्यामुळे जग एक जणू ग्लोबल खेडेच झाल्याचा आभास सोशलमिडीयावर निर्माण झाला आहे.
—————–
चौकट : (भूतकाळातील फोटो मिळतो पण त्या काळातील माणूसकीचे काय )
सोशल मीडियावर या जुन्या लूकचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या फोटोंमागे केवळ ट्रेंड नाही; एक हळवी आठवण आणि एक मोठा प्रश्न दडलेला आहे. आपण भूतकाळाचा फोटो एआयने तयार करू शकतो, पण त्या काळातील माणुसकी पुन्हा तयार करू शकतो का?
—————–
चौकट : ( फोटो म्हणजे संपुर्ण कुटुंबाची गोष्ट असायची )
८०-९०च्या दशकात प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद होत नव्हता. वर्षातून एखाद्या लग्नात, सणाला किंवा कौटुंबिक कार्यक्रमात फोटो काढला जायचा. त्यामुळे एक फोटो म्हणजे केवळ चेहऱ्यांची प्रतिमा नव्हती; त्यामागे संपूर्ण कुटुंबाची गोष्ट असायची.
—————–
चौकट : ( तेव्हा ‘ऑनलाईन’ नव्हते; पण माणसे कायम ‘कनेक्टेड’ होती!)
आज जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या व्यक्तीशी आपण क्षणात बोलतो; पण शेजारच्या खोलीत बसलेल्या आई-वडिलांशी बोलण्यासाठी वेळ नसतो. कनेक्टिव्हिटी वाढली; पण कनेक्शन कमी झाले.
—————–
(एक टीव्ही, एक अंगण आणि संपूर्ण कुटुंब! )
त्या काळात घरात एकच टीव्ही असायचा. कार्यक्रमाची वेळ झाली की घरातील सगळे एकत्र बसायचे. एकच खोली, एकच स्वयंपाकघर, एकच अंगण; पण त्यात अनेक माणसांचे हसणे, भांडणे, रुसवे-फुगवे आणि प्रेम सामावलेले असायचे. आज प्रत्येकाच्या हातात स्वतंत्र स्क्रीन आहे. घरे मोठी झाली, सुविधा वाढल्या; पण एकत्र बसण्याची जागा मात्र लहान झाली.
—————–
( पत्र उशिरा पोहोचायचे; भावना मात्र मनापर्यंत पोहोचायच्या!)
पोस्टमनची वाट पाहणे, पत्र उघडताना होणारी उत्सुकता आणि त्यातील प्रत्येक शब्द पुन्हा-पुन्हा वाचणे हा संवादाचा वेगळाच अनुभव होता. आज संदेश काही सेकंदांत पोहोचतो, पण उत्तर येत नाही. पूर्वी पत्र उशिरा पोहोचायचे; आज भावना पोहोचायलाच उशीर होतो.
—————–
(एआय जुन्या कपड्यांत दाखवते; पण जुनी नाती दाखवू शकते का?)
आज एआय आपल्याला ८०-९०च्या दशकातील रूप देत आहे. जुन्या घराच्या पार्श्वभूमीत उभे करते, त्या काळातील कपडे घालते. पण या कृत्रिम आठवणी आपल्याला एक सत्यही दाखवतात – ज्या काळाला आपण फोटोमध्ये शोधत आहोत, तो काळ आपल्या नात्यांमध्ये कुठेतरी हरवला आहे.
—————–
( तंत्रज्ञानाने वातावरण ८० चे दिले, पण माणुसकीचे काय ?)
पूर्वी पैसा, सुखसुविधा कमी होत्या पण आपुलकी, प्रेम, जिव्हाळा होता. कोणतीही अडचण आली तरी सर्वजण धावून जायचे. आज कोणी मयत झाले तरी खांदा द्यायला चार माणसेही सापडत नाहीत. एआय ट्रेंडने ८०चे वातावरण दिले, पण तशी माणसे मिळतील का? हाच खरा प्रश्न आहे.
—————–
(राजकीय नेत्यांनाही एआयची भुरळ )
सध्या सोशल मीडियावर ८०च्या दशकातील लाईफस्टाईलचा ट्रेंड धुमाकूळ घालत असून प्रचंड व्हायरल होत आहे. लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सामान्य लोक, मुली आणि महिला वर्गासह राजकीय नेते, आमदार, खासदारही गंमत म्हणून याचा अनुभव घेत आहेत. माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, आ. समाधान आवताडे, खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री राजेश टोपे आदींनी देखील आपला ८० मधील रेट्रो लूक व्हायरल केला आहे.
Post Views: 6