अकलूज : ग्रामदैवत अकलाई देवीचा परिसर आणि नीरा नदीपात्राच्या स्वच्छतेबाबत अकलूज नगरपरिषदेने आधीच वैधानिक निर्णय घेऊन काम मार्गी लावलेले असताना, आयत्या पिठावर रेघोट्या मारत भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेली घाणेरडी राजकीय स्टंटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. नगरपरिषदेने अधिकृत सभेत निर्णय झाला असताना भाजपचे पदाधिकारी अचानक जागे झाले आणि कॅमेऱ्यासमोर उभे राहून ‘अकलूज भकास झाले’ असा आव आणत जनतेची डोळ्यात धूळफेक करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत आहे.
प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न अगोदरच गांभीर्याने हाताळून २५ ऑगस्ट २०२६ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. ३ अन्वये कचरा डेपोसाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा ठराव विषयपत्रिकेवर ठेवला होता. त्या दिवशी महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ च्या कलम ८१(९) नुसार आवश्यक गणपूर्तीअभावी नगराध्यक्षा सौ. रेश्मा अडगळे यांनी सभा तहकूब केली आणि ३१ ऑगस्टच्या तहकूब सभेत हा ठराव सर्वानुमते मंजूरही करून घेतला.
सत्ताधाऱ्यांनी घनकचऱ्याच्या समस्येवर कायदेशीर तोडगा काढून शहराच्या हिताचा निर्णय पदरात पाडून घेतल्यानंतर, भाजपच्या मंडळींना अचानक अकलाई देवीच्या परिसराचा पुळका आला आणि त्यांनी समाजमाध्यमांवर कचऱ्याचे व्हिडिओ व्हायरल करत नगरपरिषद काहीच करत नसल्याचे बकवास चित्र रंगवण्यास सुरुवात केली. हा जनतेच्या प्रश्नांचा पुळका नसून नगरपरिषदेच्या कामाचे फुकट श्रेय लाटण्यासाठी केलेली निव्वळ लाचार आणि उशिराची राजकीय नौटंकी आहे, अशी संतप्त चपराक स्थानिक नागरिकांनी लगावली आहे. सध्या शहरात भूमिगत गटार, पाणीपुरवठा आणि दर्जेदार सिमेंट रस्त्यांची कामे वेगाने सुरू असताना, त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून संपूर्ण शहराला बदनाम करण्याचा हा भाजपचा कुटील डाव उघडा पडला आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे, जिल्ह्याला पालकमंत्रीही भाजपचाच लाभला आहे; मग या पदाधिकाऱ्यांनी गेल्या १२ ते १४ वर्षांत नेमके काय दिवे लावले? याचा हिशोब कागदपत्रांसह जनतेसमोर ठेवून दाखवावा, असे थेट आव्हान आता भाजपला देण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेतल्यावर तोंडावर कॅमेरे धरून पोकळ भाषणे ठोकता, ही कसली लोकसेवा? अकलूजची जनता दूधखुळी नाही; कोण कागदावर अधिकृत निर्णय घेऊन प्रत्यक्षात घाम गाळतोय आणि कोण कामाचे श्रेय लाटायला उकिरड्यावर उभे राहून रील्स बनवतोय, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे असल्या छुप्या राजकीय स्टंटबाजीने अकलूजकरांची दिशाभूल करण्याचे उद्योग भाजपने त्वरित थांबवावेत, असा सज्जड इशारा दिला जात आहे.