धाराशिव – आधुनिक युगात सर्वकाही यंत्रांवर अवलंबून झाले असताना, गावागावातील काही ज्येष्ठ महिला आजही आपल्या पारंपरिक संस्कृतीची आणि जुन्या रूढींची जपणूक करताना दिसत आहेत. मे महिन्याच्या कडक उन्हात घरासमोर बसून कुरड्या, पापड्या, ज्वारीचे पापड, तांदळाचे पापड तयार करण्याची परंपरा आता हळूहळू लोप पावत चालली असली तरी काही महिला अजूनही ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत घरातील महिला एकत्र येऊन वर्षभर पुरतील इतक्या कुरड्या, पापड्या, सांडगे आणि इतर पदार्थ तयार करत असत. घरगुती चवीसोबतच त्यामध्ये आपुलकी, कष्ट आणि संस्कारांचीही जोड असायची. मात्र काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि बाजारातील तयार पदार्थ सहज उपलब्ध होऊ लागल्याने घरच्या घरी हे पदार्थ बनविण्याची परंपरा कमी होत गेली.
आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेअभावी आणि वाढत्या कष्टांमुळे अनेकांनी या गोष्टींकडे पाठ फिरवली आहे. काही ठिकाणी मशिनरीच्या साहाय्याने उत्पादन केले जात असले तरी पारंपरिक हातगुण आणि चव त्यामध्ये हरवताना दिसते. अशा परिस्थितीत काही ज्येष्ठ महिला मात्र आवर्जून वेळ काढून जुन्या पद्धतीने कुरड्या-पापड्या तयार करत आहेत.
छायाचित्रामध्ये दिसत असलेल्या ज्येष्ठ महिला गरिबी सय्यद त्या दरवर्षी नित्यनेमाने आपल्या मुलं, सुना आणि नातवंडांसाठी विशेष कष्ट घेऊन स्वतःच्या हाताने कुरड्या, पापड्या आणि इतर पारंपरिक पदार्थ तयार करण्याचे काम करतात. आधुनिकतेच्या युगातही त्यांनी जपलेली ही परंपरा कुटुंबातील नव्या पिढीसाठी संस्कार आणि जिव्हाळ्याची शिकवण ठरत आहे.
त्यांच्या या प्रयत्नांमुळे पुढील पिढीसमोर पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन होत असून ग्रामीण संस्कृतीचा गोडवा टिकून राहत आहे. आधुनिकतेच्या लाटेत हरवत चाललेल्या या परंपरा जपणाऱ्या महिलांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

























