मुंबई : भारतमातेचे महान सुपुत्र अटलबिहारीं वाजपेयी यांनी जवळपास ५ दशकांपर्यंत या देशाला दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला, त्यांनी ज्या प्रकारे भाजपा मुंबईमध्ये सुरुवात करून दिली होती त्याचप्रमाणे, पुन्हा एका मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून त्यांचे कार्य पुढे न्यायचे आहे. आज त्यांना आदरांजली देतोच आहोत पण १६ जानेवारीला आपण त्यांना खरी आदरांजली द्यायची आहे., असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई भाजपातर्फे चित्र-चरित्र प्रदर्शनी’चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अटलबिहारी यांच्या कार्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’आपली लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे. पारदर्शी आणि प्रामाणिकतेतून मुंबईची महानगरपालिका चालली पाहिजे, हा संकल्प घेऊन आम्ही या निवडणूकीत उतरलो आहोत. देशामध्ये पंतप्रधान म्हणून अटलजींनी केलेलं कार्य हे अविस्मरणीय आहे. ते नेहमी म्हणायाचे ‘रस्ते हे देशाला एकात्मतेकडे नेतात’ आणि त्यांच्याच संकल्पनेतून देशाला वर्ल्डक्लास हायवे पाहायला मिळाले. त्यांनी पहिल्यांदा प्रधानमंत्री ग्रामसडक योजना देशात सुरु केली. ज्यामुळे शहरे गावांशी जोडली गेली. भारत देश अणुसंपन्न करण्याचं काम त्यांनी केलं. मोठ्या राष्ट्रांकडून दबाव येत असताना अटलजी त्यांच्या निर्णायावर ठाम राहिले आणि आज भारत एक बलवान देश म्हणून उभा आहे.अणुस्फोटानंतर जगाने बहिष्कृत केलेल्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला ठामपणे उभं करणारे अटलजी होते.”
यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम अमित साटम,मुंबई सरचिटणीस राजेश शिरवडकर आदीची भाषणे केली.
याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय सहसंगठन महामंत्री शिवप्रकाशजी, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. कालिदास कोळंबकर, आ. विद्या ठाकूर, राजहंस सिंह, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्वेता परुळकर आदी उपस्थित होते.


















