
मुंबई : राज्यातील अलीकडच्या राजकीय घडामोडी आणि शिवसेना (उबाठा) गटातील सुरू असलेल्या पक्षांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पुन्हा नैसर्गिक युती करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.१९) केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात ‘डबल इंजिन’चे सरकार वेगाने निर्णयांचा धडाका घेत राज्याला प्रगतीपथावर घेऊन जात आहेत. अशात उद्धव यांची साथ मिळाली तर तमाम मराठी बांधवांना हवी असलेली युती राज्यात बघायला मिळेल, असे पाटील म्हणाले.
गेल्या काही वर्षांत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात अंतर्गत उलथापालथ झाली असून पक्षात दोन वेळा मोठी फूट पडली आहे. खासदार आणि आमदारांच्या पक्षत्यागाच्या घटनांमुळे पक्ष नेतृत्व, धोरणे आणि राजकीय निर्णयांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्षाची पुढील दिशा आणि भविष्यातील राजकीय भूमिका यांचा नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिवसेनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाच्या विचारांवर केली होती. त्या पार्श्वभूमीवर विचारधारात्मक साम्य असलेल्या भाजपसोबतची युती ही शिवसेनेसाठी नैसर्गिक असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. केवळ राजकीय मतभेद किंवा अहंकाराच्या आधारावर वैचारिकदृष्ट्या भिन्न पक्षांसोबत आघाडी करून राजकारण करण्यापेक्षा पारंपरिक मित्रपक्षासोबत संवाद साधणे अधिक योग्य ठरेल, असे पाटील यांनी नमूद केले.
पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील मोठा जनसमुदायाचा विश्वास आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय हित, विकास आणि स्थैर्याला प्राधान्य देत सर्व राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. महिला आरक्षणासह देशहिताच्या विविध महत्त्वपूर्ण विधेयकांना उद्धव ठाकरे आणि इतर विरोधी पक्षांनी पाठिंबा देत राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.



















