माहूर – महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी (APL) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम (डीबीटी) देऊन महागाईच्या काळात शेतकरी कुटुंबाला थेट रोख रक्कम मिळवून देत आर्थिक आधार देणे हा मुख्य उद्देश असलेल्या योजनेचे गतवर्षीचे पैसे जमा करण्यात आले नव्हते,मात्र आता ही प्रतिक्षा संपली असून, तालुक्यातील एकूण ९,३२३ पात्र लाभार्थ्यांना तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या तत्परतेने १,४२,६४,१९० रुपयाची थेट रक्कम (डीबीटी) लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात आल्याने विविध आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून समाधान पावलेल्या लाभार्थ्यांतून शासनासह तहसीलदार अभिजीत जगताप यांचे अभिनंदन करत आभार मानले जात आहे.
महाराष्ट्र सरकारने आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम (डीबीटी) देण्याची योजना लागू केली आहे. ही योजना जानेवारी २०२३ पासून कार्यान्वित आहे, आणि आता रक्कम वाढवण्यात आली आहे.
एप्रिल २०२४ पासून, या पात्र शेतकऱ्यांना प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹१७० थेट बँक खात्यात मिळतात.
ही योजना प्रामुख्याने औरंगाबाद, अमरावती विभागातील जिल्हे आणि वर्धा जिल्ह्यासाठी आहे.
या आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत (एनएफएसए ) नसलेले, परंतु केशरी (एपीएल) रेशन कार्डधारक शेतकरी लाभास पात्र आहेत. या पूर्वी १५० रुपये होते, आता प्रति लाभार्थी प्रतिमाह ₹१७० रोख रक्कम
डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रॉंस्फर द्वारे रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.
आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि रेशनची धान्याऐवजी थेट रोकड उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
महागाईच्या काळात शेतकरी कुटुंबाला थेट रोख मदत मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट असलेल्या या योजनेचे
जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीचे तालुक्यातील एकूण ९ हजार ३२३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे १ कोटी ४२ लाख ६४ हजार १९० रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार जगताप यांनी दिली असून, यापुढील कालावधीचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे.
माहूर तालुक्यातील योजनेसाठी पात्र शंभर टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसीलदार अभिजीत जगताप यांचेसह निरीक्षण अधिकारी निलेश राऊत, पुरवठा निरीक्षक गजेंद्र मिरजगावे, मिलिंद वाठोरे, पुरवठा लिपिक पूनम मांडवगडे, संतोष पहुरकर, वैभव पांढरे यांनी समन्वयाने काम करत मार्च एंड पूर्वी रक्कम खात्यात वर्ग केल्याने समाधान पावलेल्या लाभार्थ्यांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

















