
सोलापूर – ग्रामपंचायतींना १६ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणार्या निधीपैकी ५० टक्के निधी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनासाठी राखीव असल्याने या कामासाठीच हा निधी खर्च करणे बंधनकारक असल्याची माहिती यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नवरत्न थीमची प्रभावी अंमलबजावणी केल्यास गावे स्वच्छ व समृद्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी, जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ.कलशेट्टी बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, यशदाचे प्रशिक्षक शांतकुमार स्वामी, कार्यकारी अभियंते संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, प्रसाद काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते. या कार्यशाळेत यशदाचे प्रशिक्षक हनुमंत कादे, शांतकुमार स्वामी, राजेंद्र वारगड आणि भिमराव तुळजापूरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले, अबंधित निधीपैकी किमान २५ टक्के निधी पंचायत विकास निर्देशांकानुसार निवडलेल्या एक किंवा दोन थीमच्या अंमलबजावणीसाठी खर्च करणे आवश्यक आहे. रस्ते विकास कामांवर २५ टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याचे आवाहन करताना त्यांनी सॅनिटरी नॅपकिन आणि डायपर यांची योग्य विल्हेवाट लावण्यावर भर दिला. प्रत्येक घरात कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी चार डस्टबिनची व्यवस्था असावी आणि ग्रामपंचायतींनीही याउपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांनी तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील विकास आराखडे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्याचे आवाहन केले.
कोट
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करताना काळजी घेण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार ओला, सुका आणि घातक कचर्याचे वर्गीकरण व विलगीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. गावपातळीवर कचरा व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभारल्यास स्वच्छता अभियानाला अधिक बळ मिळेल, असे ते म्हणाले
Post Views: 12