रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई संबंधी प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात ४६३ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ५७ प्रकरणांमध्ये ३ कोटी ५६ लाख ९६ हजार ८३८ रुपये इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
मोटार अपघात प्रकरण १९ / २०२३ मध्ये महेंद्र दिनानाथ कोळगावकर यांना रक्कम पंचेचाळीस लाख रुपये या रक्कमेचा आय.सी. आय.सी.आय, लोंबाड विमा कंपनी मार्फत चेक सुपुर्द करण्यात आला आहे.
तसेच यासह कौटुंबिक न्यायालय, अलिबाग येथे खालीलप्रमाणे ४ विवाह विषयक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्याने लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यव होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. न्यायालयात भरलेली कोर्ट फीस परत मिळते. त्यामुळे आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
रायगड-अलिबाग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.एस.राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सदस्य सचिव, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे ,अशी माहिती रायगड-अलिबाग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली आहे.