मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळणार ई डब्लू एस प्रमाणपत्र : हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे यशस्वी भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
मुक्रमाबाद – प्रतिनिधी
मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम विद्यार्थ्यांना शालेय आणि नोकरी व्यवसायाच्या कामासाठी आवश्यक असणारे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्यामुळे याबाबतीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तातडीने तहसीलदारांना आदेश काढून मुस्लिम समाजासह संबंधित सर्व घटकासाठी प्रमाणपत्र त्वरित वितरित करावेत असे आदेश दिले आहेत. बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नामुळे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या ईडब्ल्यूस प्रमाणपत्राचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
शिक्षणात आणि नोकरी उद्योग व्यवसायामध्ये मुस्लिम समाजासह अन्य घटकासाठीही ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अत्यावश्यक झाले आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुस्लिम समाजातील शेकडो विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तहसील कार्यात अर्ज दाखल केले. मात्र विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक हे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रार ऑल इंडिया तंन्जिम ए इंसाफ च्या वतीने जिल्हाध्यक्ष शेख रियाज यांनी केली होती.
या तक्रारीनुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र द्या अन्यथा आमरण उपोषण करू असा इशाराही रियाज शेख यांनी दिला होता. या उपोषणाच्या इशाराची दखल घेत मुखेड शहर काँग्रेस तालुका अध्यक्ष हनुमंत नारनाळीकर यांनी सामाजिक व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह तहसील प्रशासनाच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनास पाठिंबा दिला होता.
रियाज शेख आणि नारळीकर यांच्या या सामाजिक आंदोलनाची दखल घेत मुस्लिम समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे अनुषंगाने आणि त्यांच्या ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची तातडीने भेट घेतली. इडब्लूएस प्रमाणपत्र त्वरित वितरित करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी विनंती केली.
बेटमोगरेकर यांच्या मागणीकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून सहकार्य करत जिल्हाधिकारी राऊत यांनी संबंधित तहसीलदारांना तातडीने प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नामुळे मुस्लिम समाज घटकातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे अर्थात ईडब्लूएस प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.