त. भा., दि . 4 प्रतिनिधी
वाळूज महानगर : गेल्या कित्येक दिवसापासून साजापूर मार्गे भांगशीमाता गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ मठे खड्डे झाले होते, नुकत्याच या रस्त्यावर सिमेंटीकरण करून नवीन दुपदरी रस्ता तयार कऱण्यात आला आहे. परंतु दौलताबाद रस्त्याकडून भांगशीमाता गडाकडे जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्यावर मध्यभागी अर्धा किलोमीटर परिसरात विद्युत पोल उभे आहे. या पोलला धडकून एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाळूज परिसरातील भांगसी माता गडाकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे तसेच याच परिसरात आरटीओचे कार्यालय असून या मार्गावर मोठ्या वाहनाची वर्दळ नेहमी असते.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात आलेल्या या सिमेंट रस्त्यांच्या बांधकामावेळी रस्त्यात येणारे अर्धा किलोमीटर परिसरातील रोडवरील विद्युत पोल काढण्यात आलेले नाही. हे पोल रस्त्याच्या मधोमध असून, मृत्यूला निमंत्रण देतांना दिसून येत आहे. महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम यांचा सावळा गोंधळ यामधून दिसून येत आहे.
एरवी नागरिकांकडून कडक वसुली करण्याची मोहीम महावितरण तातडीने राबविते आपले काम किती प्रामाणिक आहे हे दाखविते. परिणामी बिल न भरल्यास वीज प्रवाह खंडित करते. त्याच प्रमाणे आता महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यामधील विजेचा खांबांपासून एखादा अपघात होऊन मृत्यूची वाट बघत आहे का?
असा सवाल नागरिक करत आहे.
रस्त्यामध्ये विद्युत खांब येत असतानाही ठेकेदाराने रस्त्याचे काम उरकून घेतले आहे विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने ‘सावधान या रस्त्यावर विद्युत खांब आहेत वाहने सावकाश चालवा’ अशा आशयाचे पोस्टर लावून मोकळे झाले आहे.
या वर्दळीच्या ठिकाणावर विद्यार्थी, पालक, नागरिक, शेतकरी ये-जा करत असतात. या रस्त्यांच्या मध्यभागी येणाऱ्या विजेच्या खांबांची त्वरित व्यवस्था करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करित आहे. महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग याविषयी काय भूमिका घेते की होणाऱ्या अपघाताची जबाबदारी घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.