मुंबई – जनसंचार आणि पत्रकारिता क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे भारतीय जनसंचार संस्थान, आयआयएमसी अमरावतीची बडनेरा येथील प्रस्तावित इमारत 2027 पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज दिले. अमरावती महानगर पालिका आयुक्तांच्या निवास स्थानी उच्चस्तरीय आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती.

यावेळी महानगर पालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, केंद्रीय लोक निर्माण विभागाचे मुख्य अभियंता डी. रायचौधरी,आय.आय.एम.सी. स्पेशल प्रोजेक्ट डायरेक्टर रश्मी रोजा, भारतीय जनसंचार संस्थेचे क्षेत्रीय निदेशक डॉ. राजेश सिंह कुशवाहा, विशेष कार्य अधिकारी डॉ. मनोज कुमार सोनोने संजय बसेडिया, अभिजीत कावरे, विष्णू राठोड यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनसंचार संस्थान, अमरावतीचे प्रस्तावित इमारतीचे बांधकाम करताना प्रत्येक टप्प्याची आखणी करा. पहिला टप्पा दर्जेदाररित्या पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्याची निर्मिती करा. बदलत्या हवामानात बांधकाम बंद असतांना इमारतीला लागणारे दरवाजे, खिडक्या व इतर फर्निचरची गुणवत्ता तपासण्याचे काम करून निश्चित वेळेचा सदुपयोग करा, असे निर्देश देत 2027 चे शैक्षणिक सत्र बडनेराच्या प्रस्तावित नवीन व अत्याधुनिक इमारतीत सुरू करा, असे जाजू यावेळी म्हणाले.

केंद्र शासनाच्या वतीने आयआयएमसीच्या नवीन इमारती करिता बडनेरा येथे देण्यात आलेल्या 15 एकर जागेची पाहणी यावेळी सचिव संजय जाजू यांनी केली. या 15 एकर जागेवर शैक्षणिक वर्ग, प्रशासकीय इमारत, क्रीडा संकुल, विद्यार्थी व कर्मचारी निवासस्थानाची आखणी व त्या संबंधित तांत्रिक बाबींची माहिती त्यांनी घेतली. या बैठकीला आयआयएमसी अमरावतीचे कर्मचारीही उपस्थित होते.


दरम्यान अमरावती दौऱ्यापूर्वी सचिव संजय जाजू यांनी आज नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी, दूरदर्शनच्या तसंच पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून जाहिरात संकलनाच्या कार्याला गती देण्याचे निर्देश त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले . याप्रसंगी आकाशवाणी नागपूरच्या अभियांत्रिकी कार्यक्रम तसेच वृत्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पत्र सूचना कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.