वैराग – सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद यांच्या अधिकारातील वैराग माढा रस्त्यावर वैराग एसटी स्टॅडपासून ते संतनाथ कारखान्यापर्यंत खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत होते. वारंवार मागणी करून सुद्धा या ठिकाणचे खड्डे बुजवले जात नव्हते त्यामुळे बांधकाम खात्याच्या निष्क्रीय कारभाराला त्रासून कंटाळून वैराग येथील आण्णा ग्रुपने स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन काहींचे बळी गेलेले असतानाही निष्क्रीय आणि उदासीन सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नव्हता अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांच्या सहभागातून येथील आण्णा ग्रुपचे अध्यक्ष वैजनाथ आदमाने व मेजर जगन्नाथ आदमने यांच्या पुढाकारातून रविवारी या रस्त्यावर मुरूम व खडी टाकून रस्ते दुरुस्तीचे काम चालू करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वैराग ते माढा हा सतत रहदारी व गर्दीचा असणारा रस्ता आहे या रस्त्यावर विद्यामंदिर शाळा , नवीन मराठी विद्यालय, तुळशीदास जाधव प्रशाला, डेफिडेल इंग्लिश मीडियम स्कूल, रवी बाल संस्कार केंद्र, वैरागचा विस्तारित भाग, शिवाजीनगर परिसर असल्यामुळे या रस्त्यावरून शाळकरी मुलांची व नागरिकांची मोठी ये जा असते .
बाबासाहेब रेड्डी यांनी सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद ग्रामीण यांच्याकडे हा रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार लेखी मागणी केली होती. निवेदन देखील दिले होते तरी देखील या दोन्ही खात्याने या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या या जीव घेण्या रस्त्याची वैराग येथील सामाजिक कार्यकर्ते व आण्णा ग्रुपने दखल घेतली व त्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले असून त्यामुळेआण्णा ग्रुपचे सर्वत्र कौतुक केले जात आहे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दखल घेऊन कॉंक्रिटीकरण करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वैरागकरामधून व्यक्त केली जात आहे .

















