देगलूर / नांदेड : देगलूर तालुक्यातील होट्टल फाटी ते हॉटेल आणि पुढे करडखेड गावाजवळपास रस्ता नुकताच नव्याने तयार करण्यात आला असून दळणवळणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा ठरला आहे. मात्र रस्ता चांगला आणि रुंद झाल्याने भरधाव वाहनाची संख्या वाढली. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत या मार्गावर पाच अपघात घडले असून त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर अनेकजण जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत.
दरम्यान देगलूर ते होट्टल मार्गावरील लिंगनकेरुर चढावाजवळ भरधाव दुचाकी वाहनांच्या झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघांचा उपचार चालू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कुशावाडी गावाजवळ दोन अपघात, तर काठेवाडी गावाच्या आसपास दोन अपघात घडल्याची नोंद आहे. याअपघातांच्या या मालिकेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या चार दिवसांत घडलेल्या पाच अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. हा रस्ता चांगल्या दर्जाचा झाल्याने येरगी, देवापूर, होट्टल, माळेगाव (मक्ता), झरी, मरखेल, गवंडगाव, काठेवाडी, शिवणी, आदी गावांतील प्रवासी मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करत आहेत. मात्र वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लिंगनकेरुर चढावाजवळ अतिवृष्टीमुळे रस्त्याची एक बाजू खचली आहे. याठिकाणी केवळ दगडाचे निशाणी करण्यात आले आहे, त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी तातडीने तटबंदी उभारणे अत्यावश्यक असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अतिवृष्टी होऊन जवळपास दोन – तीन महिने उलटली तरी प्रशासनाकडून ठोस भूमिका घेण्यात आली नाही, यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे. या मार्गावरील अपघाताचे सत्र थांबविण्यासाठी गतिरोधक (स्पीड ब्रेकर), सूचना फलक, वेगमर्यादा फलक व संरक्षण भिंती उभाराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष नाही दिल्यास भविष्यातही अपघातांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आतातरी प्रशासन जागे होणार का? लिंगनकेरुर चढावाजवळील तटबंदी आणि दिशादर्शक फलके लावणार का? गतीरोधक उभारुन भरधाव वाहनाच्या गतीला आळा घालण्यार का ? की आणखी बळी गेल्यानंतरच उपाययोजना केल्या जाणार, असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत.


















