वैराग – अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहरात यंदाही ‘एकता महिला मंच’च्या वतीने भव्य ‘महिला बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी निघणाऱ्या या रॅलीतून महिला सक्षमीकरणाचा आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला जाणार असल्याची माहिती मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी दिली आहे.
पारंपारिक वेशभूषा आणि भगवा माहोल
दरवर्षीप्रमाणे यंदाही ही रॅली शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. रॅलीचा प्रारंभ शिवाजी कॉलेज येथून होऊन पांडे चौक येथे समारोप होईल. रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे सहभागी महिलांचा पारंपारिक पोशाख असणार आहे. कपाळावर चंद्रकोर, डोक्याला फेटा आणि हातात भगवा झेंडा घेऊन शेकडो महिला दुचाकीवर स्वार होऊन शिवरायांच्या विचारांचा जागर करणार आहेत.
मंचतर्फे विशेष सोय
सहभागी होणाऱ्या सर्व महिला भगिनींसाठी एकता महिला मंचच्या वतीने फेटे बांधण्याची तसेच अल्पोपहाराची विशेष सोय करण्यात आली आहे. रॅलीमध्ये शिस्त राखली जावी आणि नियोजन अचूक व्हावे यासाठी काही नियमही आखून दिले आहेत. सहभागी महिलांनी स्वतःची दुचाकी आणणे आणि ती भगव्या ध्वजाने सुशोभित करणे अपेक्षित आहे.
प्रमुख संदेश: महिला सुरक्षा आणि सामाजिक सक्षमीकरण
या रॅलीच्या माध्यमातून केवळ शिवजयंती साजरी करणे हाच उद्देश नसून, समाजात महिलांचे स्थान आणि त्यांची शक्ती अधोरेखित करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. “महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत; त्या आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे समाजाचे नेतृत्व करू शकतात,” हा ठाम संदेश या रॅलीद्वारे संपूर्ण बार्शी तालुक्यात पोहोचवला जाणार आहे.नाव नोंदणीचे आवाहन: या भव्य रॅलीच्या नियोजनासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. बार्शी तालुक्यातील एकता महिला मंचच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. नाव नोंदणीसाठी प्रभाकर क्षीरसागर यांच्या ७२१८३३८००९ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

























