टेंभुर्णी : बहुजन सत्यशोधक संघ या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने टेंभुर्णी शहरात शुक्रवार (दि. १३ मार्च) रोजी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. टेंभुर्णी येथील बसस्थानकाचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसस्थानक – टेंभुर्णी” असे नामकरण करण्यात यावे, तसेच सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्थेतील अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी असलेला निधी इतरत्र वळविणाऱ्या शासनाच्या निर्णयाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. तसेच महात्मा ज्योतिराव फुले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांनाही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला. शेवटी टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर मोर्चाची सांगता करण्यात आली.
यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओव्हाळ यांनी सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्थेतील अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी असलेला निधी शासनाकडून इतरत्र वळविला जात असल्याचा आरोप केला. या निर्णयामुळे अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा मुंबई येथील आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच येत्या १४ तारखेपर्यंत टेंभुर्णी बसस्थानकाचे नामकरण न झाल्यास महार वतन जागेतून बसस्थानक हटविण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महावीर वजाळे यांनी सांगितले की, सन १९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेंभुर्णी येथे आले होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे टेंभुर्णी ही ऐतिहासिक भूमी आहे. तसेच सध्याचे बसस्थानक महार वतन जागेत असल्याने त्या बसस्थानकाचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसस्थानक – टेंभुर्णी” असे नामकरण तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी वडार समाजाचे नेते बाबा धोत्रे, महेंद्र सोनवणे, रणजित गायकवाड तसेच अधिवक्ता तुकाराम राऊत यांनीही बसस्थानकाचे नामकरण लवकरात लवकर न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
या मोर्चामध्ये परमेश्वर खरात, यशपाल लोंढे, राजकुमार लांडगे, समीर नाईकनवरे, बिभीषण कांबळे, भीमा साळवे, अमर गायकवाड, अरविंद गायकवाड, सनी खरात, सूरज शिंदे, पोपट लोंढे, बबन किर्ते, निलेश खरात, राजवर्धन वजाळे, बाळासाहेब खरात, सचिन खरात, प्रशांत गायकवाड, श्रीकांत जवंजाळ, आबासाहेब पाटोळे, प्रकाश गायकवाड, राजाभाऊ शिंदे, मनोज शिंदे, महेंद्र शिंदे, कृष्णा पवार, उल्हास खरे, लक्ष्मण शिंदे, अतिश ओहोळ, सतीश वाघमारे, मल्हारी फाळके, समाधान कांबळे, विकी भोसले, गौतमी गायकवाड आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी शासनाच्या वतीने टेंभुर्णी मंडळ अधिकारी सुजित शेळवणे, ग्राम महसूल अधिकारी शिवाजी घाडगे तसेच पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांनी निवेदन स्वीकारले.

























