सोलापूर : राजेश्वरी नगर येथील एन.के. किड्स स्कूलचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात, पण तितक्याच भावनिक वातावरणात पार पडला. लहानग्यांच्या निरोपाच्या क्षणी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे डोळे पाणावलेले दिसत होते.
या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी आपल्या मनोगतातून पालकांना महत्त्वाचा संदेश दिला. “लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईलचा अतिरेक त्यांच्या नाजूक डोळ्यांवर विपरीत परिणाम करतो,” असे सांगत त्यांनी पालकांना सजग राहण्याचे आवाहन केले. तसेच, “मुलांचे संगोपन करताना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण शाळेपेक्षा मुलं जास्त वेळ पालकांच्या सहवासात असतात,” असेही त्यांनी भावनिक शब्दांत नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इरा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सुरेश नारायणकर होते. त्यांनी आपल्या भाषणात बँकेच्या ‘विद्या धन’ योजनेची माहिती देत लहानपणापासून बचतीची सवय कशी लावावी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेड शिक्षिका दिपाली कुलकर्णी, अश्विनी सिंघम, पुनम कळसाईत, सेविका संगीता हेगडकर व सुरेखा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
निरोप समारंभाच्या शेवटी लहानग्यांनी शाळेला आणि शिक्षकांना दिलेला निरोप प्रत्येकाच्या मनात एक गोड आठवण बनून राहिला. “आज निरोप आहे, पण या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील,” अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
















