बार्शी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जयंती मिरवणुकीदरम्यान उद्भवणाऱ्या सर्व अडचणी व मार्गावरील समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.
ही बैठक शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे, महावितरणचे अधिकारी विनोद घोलप, विक्रम विधाते, तसेच डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी स्पष्ट केले की, जयंती मिरवणुकीदरम्यान डीजेचा वापर करण्यास सक्त मनाई असेल. त्याऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उत्सवाच्या दिवशी शहरात ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार असून, अवैध दारु विक्रीवर कडक कारवाई करण्यात येईल. मद्यपान करुन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे यांनी सांगितले की, शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांजवळील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मिरवणुकीच्या दिवशी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले जातील. तसेच, शहरात दोन दिवसांआड नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीदरम्यान विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे काही सूचना व मागण्या मांडल्या.
माजी नगरसेवक आण्णासाहेब लोंढे यांनी बार्शी हे सर्वधर्मीय सलोख्याने सण-उत्सव साजरे करणारे शहर असल्याचे सांगत प्रशासनाने मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाला पूर्ण सहकार्य करावे, अशी मागणी केली. अजित कांबळे यांनी मिरवणूक मार्गावरील वीजपुरवठा खंडित होऊ नये तसेच जयंतीच्या आदल्या दिवशी शहरात पाणी सोडण्याची मागणी केली.
नगरसेवक संदेश काकडे यांनी मिरवणूक मार्गावरील अडथळे व अडचणी वेळेवर दूर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. अॅड. विवेक गजशिव यांनी शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.
दीपक काकडे यांनी मिरवणुकीदरम्यान कोणीही गैरवर्तन केल्यास त्याला तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले. या बैठकीत सोनू भोसले, धीरज बोकेफोडे, शौकत काझी, रुपेश बंगाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करुन यंदाचा जयंती उत्सव शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहात साजरा करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

















