बार्शी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वृक्ष संवर्धन समिती, बार्शीतर्फे स्वच्छता मोहीम झाली. बार्शीतील कोर्ट परिसरात असलेल्या पुतळा पार्क येथे या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी सहा ते आठ या वेळेत चाललेल्या या मोहिमेत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर महापुरुषांचे पुतळे स्वच्छ पाण्याने धुण्यात आले. शेवटी महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. लहान मुले महिला यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. मागील सात वर्षापासून वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून अनेक वृक्ष लावून ती जगवण्यात आली आहेत.
स्वच्छ बार्शी सुंदर बार्शी आणि हरित बार्शीचा वसा घेतलेल्या या समितीमार्फत अविरतपणे दररोज सकाळी दोन तास श्रमदान केले जाते आणि प्रत्येक वर्षी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त येथील परिसर स्वच्छ करुन महापुरुषांना अभिवादन केले जाते. स्वच्छता मोहिमेचे हे पाचवे वर्ष आहे. सध्या राज्यात पुतळ्यावरुन सुरु असलेल्या दूषित वातावरणात बार्शीतील वृक्ष संवर्धन समितीने एक आदर्श पायंडा पाडला आहे. याचे शहरभरातून कौतुक होत आहे.
























