सोलापूर : प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सोलापुराशी अतूट ऋणानुबंध असून त्यांच्या प्रत्येक भेटीने या नगरीला सामाजिक व वैचारिक क्रांतीची नवी दिशा दिली. शहर व जिल्ह्याला वारंवार लाभलेल्या त्यांच्या पदस्पर्शामुळे सोलापूरची ओळख परिवर्तनवादी विचारांच्या केंद्रस्थानी निर्माण झाली. त्यांनी उपस्थित राहिलेल्या परिषद, मानपत्र सोहळे आणि प्रभावी भाषणांमधून सोलापूरकरांना स्वाभिमान, संघटन आणि स्वावलंबनाचा मूलमंत्र दिला. “तुमच्या मताची किंमत मिठ-मिरचीसारखी समजू नका” आणि “स्वतःच्या पायावर उभे राहून सर्वागीण उन्नती करा” हा त्यांचा प्रेरक संदेश आजही समाजाला दिशा देणारा ठरत आहे.
प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सोलापुरशी अतुट ऋणानुबंध होता. शहर – जिल्ह्याला अनेकवेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श लाभला. भारतरत्न डॉ. आंबेडकर ज्या-ज्या वेळी सोलापुरला आले त्यावेळी झालेल्या परिषदा, मानपत्र सोहळा, भाषणे या सर्व क्रांतीकारक घटना सोलापूरकरांसाठी स्फूर्तीदायी ठरल्या.तुमच्या मताची किंमत मिठ-मिरची, सारखी समजू नका !, स्वतःच्या पायावर उभे राहून सर्वागीण उन्नती करा !!, असा प्रेरक संदेश त्यांनी दिला.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेकवेळा सोलापूर जिल्ह्यात आले. त्या दरम्यान साधारणतः १४ विविध कार्यक्रम पार पडले. १ जानेवारी १९२५ मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेने डॉ. आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मिलिंद नगरात पहिल्या वसतिगृहाची स्थापना केली होती. बार्शी येथे देशांतर – नामांतर की धर्मांतर १ मे १९२४ मध्ये बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने परिषद झाली. या परिषदेत देशांतर-नामांतर की धर्मातर यावर महत्त्वपूर्ण भाष्य करीत धर्मांतराचा संकल्प आंबेडकर यांनी बार्शी येथे केला. धर्मांतराबाबतचे चिंतन त्यांनी व्यक्त केले होते.
दि. २६ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी सोलापूर शहरात थोरला राजवाडा (मिलिंद नगर) येथे सोलापूर जिल्हा महार वतनदार परिषदेचे दुसरे अधिवेशन झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब उपस्थित होते. स्वतःच्या पायावर उभे राहून सर्वागीण उन्नती करा, स्वतंत्र व्हा, स्वतंत्र वसाहती निर्माण करुन निर्भयपणे जगण्याचा मंत्र त्यांनी यावेळी दिला. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मांतराचा ठरावही केला होता. ६ मार्च १९३२ रोजी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे स्पृश्य व अस्पृश्य मंडळींसमोर डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी भाषण झाले होते. भारतीय गोलमेज परिषदेच्या मतदार कमिटीची स्पेशल गाडी सोलापूर स्टेशनवर आल्यानंतर स्टेशन बाहेर जमलेल्या जनसमुदायाच्या आग्रहास्तव बाहेर येऊन त्यांनी मार्गदर्शन केले होते.
करकंब येथे ३१ डिसेंबर १९३७ रोजी मातंग समाजापुढे भाषण झाले. जातीभेद ही वरुन वाहत आलेली गटारगंगा असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर येथे ३१ डिसेंबर १९३७ रोजी जिल्हा राजकीय परिषद झाली. त्यात त्यांनी जुलूमांविरुद्ध प्रतिकार करण्याचा संदेश दिला. निर्भय होण्याचे आवाहन केले.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दि. २४ एप्रिल १९३७ रोजी या ऐतिहासिक विहिरीचे उद्घाटन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकरांनी चांदीच्या ग्लासामधून पाणी वर काढून या विहिरीचे उद्घाटन केले होते. सोलापुरातील धाकटा राजवाडा येथेही त्यांनी भेट दिली होती.
त्यानंतर आंबेडकर हे १ जानेवारी १९३८ रोजी सोलापुरात आले होते. नव्या वर्षाच्या दिवशीच सोलापुरात त्यांनी हिंदी ख्रिस्ती समाजाला मागदर्शन केले होते. सोलापूर नगरपालिकेच्या वतीने डॉ. आंबेडकरांना मानपत्र प्रदान करण्यात आले होते.
दरम्यान, कसबे – तडवळे (ढोकी) येथे २३ फेब्रुवारी १९४१ रोजी वतनदार महार-मांग परिषदे डॉ. बाबासाहेब उपस्थित होते. कॉंग्रेसपासून सावध रहा, असे आवाहन करतानाच त्यांनी त्यावेळी आपला संसार आपणच केला पाहिजे. सन्मानाने जगण्यासाठी राजकीय हक्काची सत्ता आपल्या हाती पाहिजे, असा मूलमंत्र दिला होता.
सोलापूर शहरात नगरपालिकेच्या वतीने दोनवेळा आणि अस्पृश्य जनतेतर्फे एकदा असे तीन वेळा डॉ.बाबासाहेबांना धाटात मानपत्र अर्पण करण्यात आले होते. सोलापुरात थोरला राजवाडा येथे २४ मे १९३२ रोजी तत्कालिन अस्पृश्य जनतेच्या वतीने प्रथमच डॉ. बाबासाहेबांना मनोभावे मानपत्र प्रदान करण्यात आले. बेंच मॅजिस्ट्रेट पापय्या बाबाजी बेलपवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. भागवत चित्र मंदिर येथे १ जानेवारी १९३८ रोजी नगरपालिकेच्या वतीने रावबहादूर डॉ. व्ही. व्ही मुळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. हरिभाई देवकरण हायस्कूलच्या कै. रा.ब. मुळे स्मारक मंदिरात दि. १४ जानेवारी १९४६ रोजी जिल्हा लोकल बोर्ड व नगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले.
तीन ऐतिहासिक भेटींचा
साक्षीदार थोरला राजवाडा
सोलापुरात थोरला राजवाडा येथे
तीन वेळा डॉ. आंबेडकरांची भेट लाभली.
दि. २६ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी सोलापूर शहरात थोरला राजवाडा (मिलिंद नगर) येथे सोलापूर जिल्हा महार वतनदार परिषदेचे दुसऱ्या अधिवेशनासाठी डॉ. आंबेडकर आले होते. २४ मे १९३२ रोजी तत्कालिन अस्पृश्य जनतेच्या वतीने प्रथमच डॉ. बाबासाहेबांना मनोभावे मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर २४ जानेवारी १९३७ रोजी मुंबई लेजिस्लेटीव्ह असेम्ब्ली निवडणुकी निमित्त डॉ. आंबेडकर सोलापुरात आले होते. थोरला राजवाडा येथील मंडपात त्यांचे भाषण झाले.
बावीतील मुक्काम ठरला ऐतिहासिक
जानेवारी १९२५ मध्ये माता रमाई यांची प्रकृती खालावली होती. हवा पालट म्हणून तेव्हा डॉ. बाबासाहेब सहकुटुंब माढा तालुक्यातील बावी येथे मुक्कामी आले होते. समाज सुधारक वालचंद कोठारी यांच्या मळ्यात ते काही दिवस राहिले होते.
सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ
सोलापुरात रोवली
हरिमाई देवकरण हायस्कूलच्या कै. रा. ब. मुळे स्मारक मंदिरात दिनांक १४ जानेवारी १९४६ रोजी जिल्हा लोकल बोर्ड व नगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले. “सार्वजनिक कार्याची मुहुर्तमेढ सोलापूरात मी रोवली”, असे डॉ. आंबेडकरांनी त्यावेळी अभिमानाने सांगितले. मजूरमंत्री या नात्याने मजुरांच्या हिताकडे अधिक लक्ष देत आहे. मजुरांच्या हिताचे १० कायदे करीत आहोत, ज्यामुळे देशाचे सामाजिक व आर्थिक दारिद्रय दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. बडबड करण्यापेक्षा कृतीला महत्त्व असल्याचे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले.
तुमच्या मताची किंमत
मिठ-मिरची सारखी समजू नका !
२४ जानेवारी १९३७ रोजी मुंबई लेजिस्लेटीव्ह असेम्ब्ली निवडणुकी निमित्त डॉ. आंबेडकर सोलापुरात आले होते. थोरला राजवाडा येथील मंडपात त्यांचे भाषण झाले. तुमच्या मताची किंमत मिठ-मिरची, सारखी समजू नका, तुमच्या प्राणा इतकीच किंबहुना त्याहुन जास्त तुमच्या मताची किंमत आहे, हे विसरु नका, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले होते.

























