सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत आषाढी वारीसाठी तब्बल ११ कोटी रुपयांच्या औषध खरेदीला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे हा विषय मूळ अजेंड्यावर नसतानाही ऐनवेळी ‘आयत्या वेळेचा विषय’ म्हणून सभेत मांडण्यात आला आणि त्यास एकमताने मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी रुपये, तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही आरोग्य विभागाकडून औषध खरेदीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नव्हती. हा विषय मूळ अजेंड्यावर नसल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी तातडीने विषय सभेत आणून मंजुरी घेतल्याची चर्चा सभागृहात रंगली.
जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात सभा पार पडली. जवळपास तीन तास चाललेल्या या सभेत शिक्षण, आरोग्य, शेती, पशुसंवर्धन, डीपी-ट्रान्सफॉर्मर, शिक्षकांची कमतरता, जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली; मात्र अनेक मुद्द्यांवर ठोस निर्णय न झाल्याने सदस्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले.
विरोधी पक्षनेते नसल्याने चर्चेदरम्यान अनेक विषय भरकटल्याचे चित्र दिसून आले. अखेर सभागृह नेत्या रश्मी बागल यांनी हस्तक्षेप करून चर्चा आटोपती घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पुढील सभेत सविस्तर चर्चा करण्याचे आणि आठ दिवस आधी लेखी माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सभा संपविण्यात आली.
सभेमध्ये बोरामणी गटाचे सदस्य नेताजी खंडागळे यांनी जिल्हा परिषद आवारातील जागेवर व्यापारी संकुल उभारून उत्पन्न वाढविण्याचा प्रस्ताव मांडला. माढा तालुक्यातील सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी माढा चौकात व्यावसायिक गाळे उभारण्याची सूचना केली. माथाडी प्रतिनिधी अतुल पवार यांनी “गाळे उभारणे शक्य नसेल तर जागा भाडेतत्त्वावर द्यावी,” अशी भूमिका मांडली.
सभेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय तथा सांगोल्यातील देशमुख यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ज्योती वाघमारे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. जिल्हा परिषदेला पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल कुलदीप जंगम यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरणे, शाळांमध्ये शिपाई नेमणे, प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करणे, नेहरू वस्ती योजनेतील स्वच्छता, तसेच पंढरपूर येथील बंद वसतिगृह पुन्हा सुरू करण्याची मागणी यांसारखे विषयही चर्चेत आले. दुरुस्तीअभावी आणि कमी प्रवेशसंख्येमुळे वसतिगृह बंद असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
बोरामणी गटातील अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याचा मुद्दा नेताजी खंडागळे यांनी उपस्थित केला. मित्रपक्ष सदस्यांनी “सोबत असूनही सन्मानाची वागणूक मिळत नाही,” अशी नाराजी व्यक्त करत समिती नियुक्त्यांमध्ये विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला. त्यावर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी कोणालाही नाराज केले जाणार नसल्याचे सांगत सदस्यांची समजूत काढली.
आषाढी वारी नियोजनाबाबत सभागृह नेत्या रश्मी बागल यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जर्मन हँगर, पाणीपुरवठा, शौचालये, मोबाईल ट्रॉली यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. शेगावहून येणाऱ्या गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी ऊळेगाव येथे आवश्यक सुविधा द्याव्यात, अशी मागणीही सदस्यांनी केली.
या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील, वित्त व लेख अधिकारी मिनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य व अधिकारी उपस्थित होते. सभेचे कामकाज उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी पाहिले.
कोट
जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला चालना देतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे निर्णय
सभेमध्ये शेतकरी, पशुपालक, महिला, दिव्यांग बांधव, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या योजनांवर विशेष भर देण्यात आला. पशुसंवर्धन विभागाच्या विविध उपक्रमांसह कुक्कुट विकास योजना, दिव्यांगांसाठी शेळीगट व ई-बाईक योजना, अंगणवाडी सक्षमीकरण, ग्रामीण रस्ते व पूल विकास अशा विविध विषयांना सभागृहाने मंजुरी दिली. जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला चालना देतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे निर्णय या सभेत घेण्यात आल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले. विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
– दीपक वैद्य, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
कोट
जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढी संदर्भात चर्चा
सोलापूर जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करून अनेक जनहिताचे ठराव मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढी संदर्भात चर्चा करण्यात आली. सभेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली. यापुढील सभेसाठी सदस्यांनी आपले विषय सभेच्या पूर्वी कळवावेत, असे आवाहन करण्यात आले.
– इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
चौकट
जिल्हा परिषदेच्या सभेत पशुसंवर्धन सदस्यांच्या फैलावर ; चरणराज चवरेंनी दिला शिवसेना स्टाईल इशारा
सोलापूर जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सभेत पशुसंवर्धन विभाग सदस्यांच्या फैलावर दिसून आला. पशुसंवर्धन विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता, दवाखान्यात नसलेल्या सोई सुविधा, ॲम्ब्युलन्स नसल्याने सदस्यांनी अधिकारी येवले यांना चांगलेच झापले. पेनुर जिल्हा परिषद गटाचे शिवसेना सदस्य चरणराज चवरे यांनी गाड्यांची संख्या विचारली तेव्हा अधिकाऱ्यांना सांगता आले नाही, तेव्हा सभागृहात ६६ सदस्य हे नवीन आहेत जर तुम्हालाच माहिती नाही आम्हाला कसे कळणार, ही पहिली सभा ठीक आहे पण पुढील सभेला माहिती ठेवा, असा हलगर्जीपणा आम्ही पुढे खपवून घेणार नाही असा आपल्या स्टाईलने दम भरला. माढा तालुक्यातील भाजप सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी पशुसंवर्धन च्या दवाखान्यात कर्मचारी नेमणूक करण्याची मागणी केली.
चौकट
झेडपी शाळांना सुट्टी, मग अंगणवाड्यांना का नाही?
उन्हाळ्यात जिल्हा परिषद शाळांना सुट्टी दिली जाते; मात्र लहान मुलांच्या अंगणवाड्या सुरू ठेवण्यात येतात. वाढत्या तापमानाचा बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने अंगणवाड्यांनाही महिनाभर सुट्टी द्यावी आणि त्या काळातील आहार घरपोच उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सांगोला तालुक्यातील सदस्य लवटे यांनी सभेत केली.
चौकट
झेडपी प्रवेशद्वारासमोरील आंदोलने थांबवा
राज्य व केंद्र शासनाच्या विविध प्रश्नांवर जिल्हा परिषदेसमोर आंदोलने केली जात असल्याने वाहतूक आणि प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होतात. आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात यावीत, अशी मागणी सदस्य पृथ्वीराज माने यांनी केली.
चौकट
सर्वसाधारण सभेला वरिष्ठ अधिकारी हजर राहावेत.
जिल्हास्तरीय अधिकारी सभेला स्वतः उपस्थित न राहता प्रतिनिधींना पाठवतात. त्यामुळे सदस्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. महावितरणच्या प्रश्नांवर वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित असल्याने नेताजी खंडागळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
चौकट
डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतराचा ठराव
उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
चौकट
पहिल्याच सभेत प्रश्नांची सरबत्ती; अधिकारी मात्र निर्धास्त”
जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले; मात्र त्यावर सखोल चर्चा न झाल्याने अधिकारीच पदाधिकाऱ्यांवर भारी पडल्याची चर्चा सभागृहात रंगली.
























