जेऊर – करमाळा व इंदापूर तालुक्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या उजनी जलाशयातील कुगाव (ता. करमाळा) ते शिरसोडी (ता. इंदापूर) या पुल प्रकल्पासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत पूलास मंजुरी देऊन दोन्ही तालुक्यातील दळणवळण व्यवस्था बळकट केली त्यामुळे सदर पूलास 22 जूलै रोजी असलेल्या अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्त साधून स्व.अजित दादा पवार यांचे नाव द्यावे अशी मागणी संभाजी बिग्रेड चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन खटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्रा पवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
दिलेल्या निवेदनात खटके यांनी नमुद केले की स्व, अजित दादांच्या प्रयत्नांमुळे या भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला पुल प्रकल्प मार्गी लागला असून सध्या त्याचे काम सुरू आहे.
या पुलामुळे इंदापूर व करमाळा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी नागरिकांना भिगवण–टेंभुर्णी मार्गे तब्बल ९० ते १०० किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. या लांबच्या प्रवासामुळे वेळ, इंधन आणि पैशाचा मोठा अपव्यय होत होता. त्यामुळे अनेक नागरिकांना नाईलाजाने उजनी जलाशयातून धोकादायक होडी प्रवासाचा पर्याय निवडावा लागत होता, ज्यात आतापर्यंत ५० हून अधिक नागरिकांचा बळी गेल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर कुगाव–शिरसोडी पुल प्रकल्पाला गती देण्यात अजित पवार यांच्या भूमिकेचा उल्लेख करत, त्यांच्या योगदानाची दखल घेऊन या पुलाला “स्व. अजितदादा पवार पूल” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके यांनी केली आहे.पुल पूर्ण झाल्यानंतर या भागातील प्रवास व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.