अंबड: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंबड तालुक्यातील गहिनीनाथ नगर येथे विशेष आढावा बैठक व शेतकरी संवाद पार पडला. माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपा नेते सतीश घाटगे पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेताना येत असलेल्या अडचणी व प्रश्न जाणून घेतले.
यावेळी सुनील राणे यांनी लाभार्थी शेतकरी, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कर्जमाफी योजनेची सद्यस्थिती, लाभ वितरणाची प्रक्रिया, शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी तसेच केवायसी (KYC) प्रक्रियेसंदर्भातील प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांनी मांडलेल्या सर्व अडचणी व समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून त्या तातडीने सोडविण्यात येतील, असे आश्वासन सुनील राणे यांनी यावेळी दिले. तसेच भाजपा नेते सतीश घाटगे यांनी देखील बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे आणि झिरो आयटीआरमुळे शेतकरी कसे कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत, याची अभ्यासपूर्ण माहिती सुनील राणे यांना दिली.
कर्जमाफी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत वेळेत, पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे पोहोचावा तसेच कोणताही पात्र शेतकरी यापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीतील त्रुटी व अडचणी तातडीने दूर करण्यासाठी अंबड व घनसावंगी येथील भाजपा जनसेवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सतीश घाटगे यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत सरकार व पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी किरण पाटील, भाजपचे मराठवाडा समन्वयक नितीन काळे, भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस गोविंद ढेंबरे, तालुका अध्यक्ष शिवाजी मोरे, जीवनराव वगरे, बाळासाहेब बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकर लहामगे, सरपंच पांडुरंग खटके, अनिरुद्ध झिंजुर्डे, प्रेमानंद उढाण, भगवान बर्वे, चंद्रकांत बांगर, रामेश्वर माने, राजेंद्र छल्लारे यांच्यासह स्थानिक शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















