सोलापूर : दक्षिण सोलापूरमधील विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची प्रवासाची गैरसोय अखेर दूर होणार आहे. सोलापूर-मंद्रूप मार्गावर एसटी फेऱ्या नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी जीवघेणा आणि गर्दीचा प्रवास करावा लागत होता. हा प्रश्न भाजपचे गौरीशंकर मेंडगुदले आणि तालुका उपाध्यक्ष शिवराज कालदे यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे मांडला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे लक्षात येताच आमदार सुभाष देशमुख यांनी तातडीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि सोलापूर आगार नियंत्रक यांच्याकडे पत्रव्यवहार करून फेऱ्या वाढवण्याची मागणी केली.
आमदार देशमुख यांच्या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंद्रूप_सोलापूर, तेलगाव, वडापूर आणि कारकल या चार मार्गांवर एसटी फेऱ्या सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. एक सप्टेंबरपासून सोलापूर-मंद्रूप नवीन एसटीची सहा आणि इतर गावांसाठी वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत.
सध्या सकाळच्या वेळी इतर गावांतून येणाऱ्या एसटीमध्ये प्रचंड गर्दी असल्याने मंद्रूप आणि परिसरातील विद्यार्थ्यांना जागाच मिळत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना कॉलेजला उशीर होतो आणि शिक्षणाचे नुकसान होत होते.
….
सोलापूर-मंद्रूप सकाळी एसटी नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. आमदार देशमुख यांनी पाठपुरावा केल्यामुळे आता नवीन एसटी सुरू होणार आहे. शिवाय मंद्रूप सोलापूर नवीन एसटीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
– शिवराज कालदे, तालुका उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा , दक्षिण सोलापूर
…,
महिला व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
…
आमदार देशमुख यांनी फेऱ्या वाढवल्यामुळे महिला व ज्येष्ठ प्रवाशांचा त्रास दूर होणार आहे. सुखकर प्रवासासोबतच अवैध प्रवासी वाहतुकीलाही आळा बसणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होणार नाही.
– गौरीशंकर मेंडगुदले, संघटन सरचिटणीस, भाजपा , दक्षिण सोलापूर


















