सोलापूर – येथील ग्रामदैवत श्री धुळी महांकाळेश्वर यात्रा महोत्सव व श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून शिंगडगाव ग्रामविकास मंच, स्वामी विवेकानंद हायस्कूल आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने ‘ग्राम स्वच्छता मोहीम २०२६’ उत्साहात पार पडली. “स्वच्छ गाव, सुंदर गाव, आमचे शिंगडगाव” या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या मोहिमेत विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी संपूर्ण गाव चकाचक केले.
रविवारी सकाळी ८ वाजता श्री धुळी महांकाळेश्वर मंदिर येथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. गावातील मुख्य मार्ग, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करत ही मोहीम ग्रामपंचायत समोरील श्री चन्नवीर शिवाचार्य स्वामी मठ येथे समारोप झाली.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंचच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाच्या मनामनात भिनली पाहिजे. गाव स्वच्छ राहिल्यास आरोग्य सुधारेल आणि गावाचे सौंदर्य वाढेल.” सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांनी घोषणाबाजी करत ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिला.
या मोहिमेसाठी रविशंकर बोधले सर यांच्या वतीने सर्व सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शिंगडगाव ग्रामविकास मंचच्या नियोजनाखाली ही मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली असून, ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी ग्रामसेवक जेऊरे, महारुद्र बडूरे, मल्लिकार्जुन पनशेट्टी, मुख्याध्यापक सुभाष भिमणवरू व सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी, चन्नवीर भिमणवरु, शिवानंद बोधले सर, दिनेश अचलेरे, सुनील भिमणवरु, उमेश कोरे, मल्लिनाथ बाळगी, सतीश बोधले, गंगाधर कोरे, सिद्धाराम अचलेरे, अमोल पाटील, बाबुशा बडूरे, चाँद शेख/नदाफ, राम व्हनकडे सर, सुशांत स्वामी, मल्लिकार्जुन बडूरे, संगमेश्वर फताटे, शरणप्पा मोळे, महिला बचत गटाच्या अंबिका म्हेत्रे/गुरव, भाग्यश्री बंडे आणि विविध मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















