बार्शी – राज्यभर गाजणाऱ्या आणि देशातील एकमेव असे श्री भगवंताचे मंदिर असलेल्या बार्शी येथे श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही भगवंत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी भरगच्च कार्यक्रम आणि नेटके नियोजन करण्यात आले असून, या ठिकाणी कार्यक्रमासाठी राज्यभरातून कलाकार व भक्त मोठ्या संख्येने येणार आहेत. अशावेळी बार्शी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाने सहभागी व्हावे, असे आवाहन युवा नेते रणवीर राऊत यांनी केले.
तब्बल नऊ दिवस चालणाऱ्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महोत्सवाच्या अंतिम आढावा बैठकीत भगवंत मैदान येथे ते बोलत होते. यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विजय गरड, महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, उपनगराध्य रोहित पाटील, दिपक रोंगे यांच्यासह नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, विविध पदाधिकारी तसेच बार्शी शहर व ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महोत्सवासाठी दहा दिवसांत लाखो लोक येणार असल्याने आणि यावर्षी भव्यदिव्य आयोजन करण्यात आल्याने पोलीस प्रशासन व महोत्सव समितीच्या सहकार्याने ३०० पुरुष स्वयंसेवक आणि १०० महिला स्वयंसेवक मंदिर व भगवंत मैदान येथे दहा दिवस मदतीसाठी कार्यरत असतील. प्रत्येक स्वयंसेवकास ओळखपत्र देण्यात येणार असून, गर्दी नियोजनात त्यांचा मोठा हातभार लागणार आहे. हे स्वयंसेवक पार्किंग, भगवंत मंदिर, भगवंत मैदान आणि स्टेज परिसरात लोकांना सहकार्य करतील, अशी माहिती रणवीर राऊत यांनी दिली.
भगवंत महोत्सवानिमित्त २० व २१ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे राज्यस्तरीय भारुड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत मुंबई, नागपूर, अमरावती, संभाजीनगर आदी ठिकाणांहून ४५ संघांनी सहभाग नोंदवला आहे. यातील निवडक भारुडे २० एप्रिल रोजी सायंकाळी ६ नंतर भगवंत मैदान येथे सादर केली जाणार आहेत.
तसेच २१ एप्रिल रोजी ‘होम मिनिस्टर’ हा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या माध्यमातून गृहिणींना त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. यामध्ये हजारो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. २२ एप्रिल रोजी ‘Folk आख्यान’ हा लोकप्रिय कार्यक्रम होणार असून, यासाठी विशेष साउंड आणि लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.
२३ एप्रिल रोजी प्रसिद्ध मराठी नाटक ‘ऑल दि बेस्ट’चे सादरीकरण होणार आहे. २४ एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. २५ एप्रिल रोजी सुदेश भोसले आणि बेला सुलाखे यांचा ‘सुरीला सिलसिला’ हा कार्यक्रम होईल. २६ एप्रिल रोजी निवडक स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, श्री शिवाजी महाविद्यालयातील युवा महोत्सवातील कार्यक्रम हे त्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
२७ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवायन’ हे भव्य महानाट्य सादर होणार आहे. दोन मजली स्टेज, आकर्षक देखावा, घोडे, बैलगाडी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.
२८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजल्यापासून मंदिरात हभप डॉ. जयवंत बोधले महाराज यांचे कीर्तन होईल. त्यानंतर बार्शी शहरातून दिंडी काढण्यात येईल. दुपारी मॉर्निंग क्लबच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर रात्री शिवशक्ती बँकेच्या सहकार्याने आतषबाजी कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
























