सोलापूर – महिला व बालविकास विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यभर आठवा राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत सर्व ग्रामीण प्रकल्पांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. या पोषण पंधरवड्याचा समारोप टेंभुर्णी येथील प्रतिष्ठा मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य होते. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्या सविता कोकाटे, अश्विनी दळवी, वंदना कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, पंचायत समिती पदाधिकारी तसेच विविध बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांनी अंगणवाडी सेविकांनी सादर केलेल्या पौष्टिक पाककृती प्रदर्शनाला भेट दिली.
शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले पदार्थ, नाचणी, बीट, सोयाबीन तसेच शासनाच्या टीएचआरपासून बनविलेल्या जवळपास १०० विविध पौष्टिक पाककृतींना उपस्थितांनी विशेष दाद दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य व सभापती अमृता वाघे यांनी अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रास्ताविकात पोषण पंधरवड्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. बालकांच्या आयुष्यातील पहिली सहा वर्षे मेंदू विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यादृष्टीने अंगणवाडी केंद्रांमार्फत विविध जनजागृती कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मेंदूचा सुमारे ६० टक्के विकास होत असल्याने या काळात मुलांचा स्क्रीन टाइम कमी ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे यांनी अंगणवाडी सेविका या गावपातळीवरील योजनांच्या प्रभावी दूत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागात पोषणाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अधिकाधिक उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात दीपक वैद्य यांनी बालकांच्या पहिल्या १००० दिवसांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच मिशन वात्सल्य अंतर्गत सुरू असलेल्या एकल महिलांच्या सर्वेक्षणाबाबत माहिती देत पात्र महिलांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सेविकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी बालकांना विद्यारंभ प्रमाणपत्रे, मातांना बेबी केअर किट, पूर्वशालेय साहित्य, आयुष्यमान भारत कार्ड तसेच विविध योजनांचे लाभ मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. किशोरी व महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. आरोग्य विभागातील आशा वर्कर व आरोग्य सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
उपस्थित मान्यवरांनी बालसंगोपन, मातृआरोग्य, अंगणवाडी सेविकांचे समाजातील योगदान आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले.
समारोपावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड यांनी पोषण शपथ देऊन उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार अधिकारी आकाश कोकाटे, पर्यवेक्षिका अनुराधा मिस्कीन, लता पाटील तसेच सर्व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.























