माळशिरस – दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेचा माळशिरस बार असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी तहसीलदार, माळशिरस यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात आली. सदरचे निवेदन महसूल नायब तहसीलदार सिद्धनाथ जावीर यांना देण्यात आले.
बार असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी शांततेच्या मार्गाने उपोषण आंदोलन करत असताना २० जुलै २०२६ रोजी पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला. ही घटना लोकशाही मूल्यांना व मानवी हक्कांना काळिमा फासणारी असून तिचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिल्लीचे पोलिस आयुक्त यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन माळशिरस बार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार, माळशिरस यांना आज देण्यात आले.
फोटो ओळी – महसूल नायब तहसीलदार जावीर यांना निवेदन देताना माळशिरस बार असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य
Post Views: 16