बार्शी – आगारातील प्रवाशांची वाढती संख्या, जुन्या बसेसची दुरवस्था आणि वाढत्या प्रवासीभाराचा विचार करुन आमदार राजाभाऊ राऊत यांनी मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांची भेट घेत बार्शी आगारासाठी २० नवीन एसटी बसेस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.
बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. तसेच बार्शी हे शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक आणि व्यापारी केंद्र असल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी आगारात लवकरच २० नवीन बसेस दाखल होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बार्शी आगारात केवळ ९७ एसटी बसेस उपलब्ध आहेत. गतवर्षीच्या तुलनेत आगारातील बसेसची संख्या १० ने घटली असून १० बसेस स्क्रॅप करण्यात आल्या आहेत. उपलब्ध बसेसचे सरासरी आयुर्मान सुमारे ११.८९ लाख किलोमीटर तर वर्षानुसार ११.३४ वर्षे इतके झाले आहे. त्यामुळे जुन्या बसेस वारंवार बिघडत असून मार्गातच बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून तक्रारींची संख्याही वाढत आहे.
बार्शी तालुक्याची मोठी लोकसंख्या, आगाराचे भौगोलिक महत्त्व आणि वाढता प्रवासीभार लक्षात घेता बार्शी आगाराला नवीन बसेसची नितांत आवश्यकता असल्याचे आमदार राऊत यांनी परिवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याने बार्शी आगारात लवकरच नवीन २० एसटी बसेस दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थी, कामगार, रुग्ण तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, नियमित आणि सुलभ एसटी सेवा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Post Views: 12