सोलापूर : शेवटच्या घटकातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मुबलक पाण्याची सोय व्हावी याकरिता प्रलंबित योजनांना गती देण्यासाठी तसेच जलसंपदा विभागाच्या महत्त्वकांक्षी योजनांच्या पूर्ततेसाठी कामाचे विकेंद्रीकरण करून मुख्य अभियंता कार्यालय सोलापुरात आणण्यात आले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केले. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद् घाटन शुक्रवारी जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते सिंचन भवन येथे फीत कापून आणि नियोजन भवन सभागृहात दीपप्रज्वलनाने जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद् घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार उत्तमराव जानकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मुख्य अभियंता संजीव चोपडे उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री डॉ. विखे – पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेल्या दुष्काळमुक्त, सिंचनयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. सोलापुरात मुख्य अभियंता कार्यालय आल्यामुळे कामाचे विकेंद्रीकरण होणार आहे. भीमा, सीना, बोरी नदीसह इतर नद्यांवर बंधारे बांधण्यात येणार आहेत. उजनी धरणातील १५ ते २० टीएमसी गाळ काढण्यासाठी महिनाभरात निविदा प्रक्रिया होणार असून तीन महिन्यांत उजनीत गाळ काढण्याचे काम सुरू होणार आहे. हे काम पुढील एक ते दोन वर्षे युद्धपातळीवर करण्यात येणार असून त्यानंतर सोलापूरला पाण्याची टंचाई भासणार नाही. भीमा नदीवर १५ बॅरेज बांधण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता शेवटच्या टोकापासून हे बांधकाम होणार आहे. तसेच दोन्ही कालव्याचे अस्तरीकरण करून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचविण्यात येणार आहे. याशिवाय पुराचे ७० टीएमसी पाणी नीरा आणि उजनीत आणून सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव तसेच इतर दुष्काळी जिल्ह्यांना देण्यात येणार आहे. आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केलेल्या उजनी, एकरुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी मंजुरी देण्यात येत असून सोलापूर महानगरपालिकेसोबत याबाबत सामंजस्य करार करणार असल्याचेही मंत्री श्री. विखे – पाटील यांनी सांगितले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, २८ वर्षे प्रलंबित असलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेला जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे या दोन्ही तालुक्यातील जमीन मोठया प्रमाणात सिंचनाखाली आली आहे. बॅरेज, सर्व्हेक्षण, पीडीएन, कालवा देखभाल दुरुस्ती, आयटी पार्कला जलसंपदा विभागाची जागा असे अनेक प्रश्न मंत्री डॉ. विखे – पाटील यांनी सोडविल्यामुळे सोलापूरकरांच्या अपेक्षांची पूर्तता होत आहे.
आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्हा कमी पर्जन्यमानाचा असल्याने येथील सिंचन योजनांची कामे मार्गी लावण्याची मागणी मनोगतातून केली. यावेळी आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तमराव जानकर, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
मुख्य अभियंता संजीव चोपडे यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सु.स. खांडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
———
चौकट १
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा आग्रह
जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालय सोलापुरात व्हावे असा आग्रह आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी धरला होता. त्यांच्या आग्रहामुळे हे कार्यालय सोलापुरात सुरू झाल्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
———
चौकट २
आयटी पार्कला जागा देता आली याचे समाधान
सोलापुरातील होटगी येथे होणाऱ्या आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाकडून जागा देता आली याचे समाधान आहे. आयटी पार्कमुळे सोलापूरकरांच्या स्वप्नाची पूर्तता होत आहे, असेही जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील याप्रसंगी म्हणाले.
Post Views: 14