देहू : वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने आयोजित ‘निर्मल वारी – हरित वारी’ अभियानांतर्गत वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्ष लागवड व वृक्षपूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. शिवाजीराव महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देहू परिसरात मोठ्या प्रमाणावर वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत हजारो वडाच्या रोपांची लागवड करण्यात येत असून, हरित महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.
यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींचा ‘वृक्षस्नेही’ म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर तथा पर्यावरण रक्षक ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पर्यावरण विषयक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र व संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा प्रदान करून यथोचित सन्मान करण्यात आला.
यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमास नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाताताई पाटील, पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर, देहूच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई दिवटे, पोलीस उपायुक्त सौ. श्वेताताई खेडकर, सौ. सारिकाताई शेळके तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 10